सोमाटणे - द्रुतगती मार्गावरील दंडात्मक कारवाईला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या कारवाईमुळे अपघातांच्या प्रमाणात घट झाली असली तरी, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या मात्र कायम आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये प्रभावी जनजागृतीची आवश्यकता आहे.
दंडात्मक कारवाईची ठिकाणे
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नऊ सप्टेंबर 2016 पासून खालापूर टोल नाका, उर्से टोल नाका व बोरघाटात विशेष पोलिस पथकांच्या साह्याने दंडात्मक कारवाई सुरू आहे.
कारवाईची पद्धत
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी मानवी ड्रोन, गोल्डन अवर्स, व्हॉट्सऍप, जीपीएस आदी पद्धतींचा वापर केला जात आहे.
कारवाईचे स्वरूप
वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दररोज किमान चारशे वाहनचालकांवर कारवाई करून किमान 75 हजार रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.
कारवाईचे फलित
9 सप्टेंबर 2016 ते 9 सप्टेंबर 2017 या वर्षभरात 45 अपघात झाले असून, त्यात 43 जणांचा मृत्यू झाला आहे. 160 जण जखमी झाले आहेत. या वरून गेल्या 17-18 वर्षांच्या तुलनेत पंचवीस टक्के अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते; परंतु वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण कायमच आहे.
अपघातांची कारणे
वेग मर्यादेचे उल्लंघन, लेनची शिस्त न पाळणे, ओव्हरटेक करणे, चालकाला डुलकी लागणे, टायर फुटणे, वाहन नादुरुस्त होणे आदी कारणांमुळे अपघात झाले आहेत. रस्ता दुभाजकातून वाहने घुसून अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
ब्रायफेन रोप-वे वायरचा पर्याय
अपघात रोखण्यासाठी रस्ते विकास महामंडळातर्फे रस्ता दुभाजकात संरक्षक तारा उभारणे (ब्रायफेन रोप-वे वायर) हा पर्याय पुढे आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर सर्वाधिक अपघात घडणारे ओझर्डे, बऊर, पिंपळोली, मळवली, ताजे, बोरज, कुसगाव, आडोशी, भातान, पळस्पेदरम्यान अपघातग्रस्त ठिकाणी संरक्षक तारा उभारल्या आहेत. उर्वरित ठिकाण संरक्षक तारा लावण्याची गरज आहे.
अपघाताबाबत दरमहा सरासरी
वर्ष अपघात मृत्यू जखमी
2000 ते 2005 8 7 25
2005 ते 2010 7 6 24
2010 ते 2016 6 5 20
9 सप्टेंबर 2016 ते 9 सप्टेंबर 2017 4 4 13 |
|