दुष्काळामुळे विद्यार्थ्यांची होरपळ; उदारनिर्वाहचा प्रश्‍न

दुष्काळामुळे विद्यार्थ्यांची होरपळ; उदारनिर्वाहचा प्रश्‍न

पुणे : "आम्ही दोघे भाऊ पुण्यात शिक्षण घेतो. सुटीच्या दिवशी केटरिंगचे काम करतो आणि त्याच्यावर संपूर्ण खर्च भागवतो. आता दुसरा पर्यायच राहिला नाही. घरच्यांनी पैसे पाठवणे बंद केले आहेत,'' नांदेड जिल्ह्यातील जरे गावाचा (ता. देगलूर) तुकाराम मारकवाड हा तरुण सांगत होता. ""माझे आई-वडील शेती करतात. यावर्षी शेतात ज्वारी आणि तूर लावली होती; पण पाऊस कमी पडल्यानं नुकसानच झालं. त्यात सरकारची सबसिडी नुकसानीच्या केवळ पाच टक्केच मिळते. हे माहीत असल्यामुळे घरून पैसे मागायलाही कसेतरी होतं,'' उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरची रत्नमाला पवार तिची व्यथा मांडत होती. ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. असे हजारो तरुण-तरुणी मराठवाडा-विदर्भातून शिक्षण घेण्यासाठी पुण्यात राहत असून त्यांची परिस्थिती यांच्यापेक्षा वेगळी नाही. 

यंदा पाऊस कमी पडल्याने मराठवाडा आणि विदर्भाला आतापासून दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. या भागातून येणारी बहुसंख्य मुलं शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन केवळ शेतीवर अवलंबून आहे. कोणत्याही प्रकारे शेतीचे नुकसान झाले की, संपूर्ण आर्थिक गणित कोलमडून जाते. खानावळ, खोली भाडे, वरखर्चासाठी लागणारा किमान खर्च भागविणेसुद्धा अवघड झाल्याचे अनेक तरुण सांगत आहेत. दिवसातून एक वेळच्या जेवणावर भागवाणारेही अनेक जण इथे आहेत. घरून पैसे येणे बंद झाल्यामुळे मिळेल ते काम करून उदरनिर्वाहापुरते पैसे मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. 

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आतापर्यंत आमच्याकडे पाचशे अर्ज आले आहेत. "कमवा शिका', "पार्ट टाइम' नोकरी करण्याची मागणी यातील बरेच तरुण करत आहेत. यामध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थीसुद्धा आहेत. 

- कुलदीप आंबेकर, प्रमुख स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड 

राज्याच्या विविध भागांतून अनेक मुली कितीतरी संघर्ष करून पुण्यात शिक्षणासाठी आल्या आहेत. दुष्काळामुळे त्यांना घरून पैसे येणे बंद झाले आहे. आता घरी ही जाता येत नाही आणि इथेही राहता येत नाही, अशा चौकटीत त्या अडकल्या आहेत. शिक्षण अर्धवट सोडून घरी गेलो, तर तरुण मुलगी घरात ठेवता येत नाही; म्हणून लग्न केल्याशिवाय पर्याय राहत नाही, पण आम्हाला शिकायचे आहे. 

- संध्या सोनवणे, विद्यार्थिनी 
------------ 
ठळक मुद्दे 
- दुष्काळामुळे स्थलांतरणात वाढ 
- शिक्षण की काम या कात्रीत सापडला विद्यार्थी 
- घरी जाता येत नाही, पुण्यात राहता येत नाही 
- खानावळ, खोली भाडे देणेदेखील अवघड झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com