पुणे : राज्यात यंदाच्या गाळप हंगामात साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे बाजारात उठाव कमी आहे. त्यामुळे सुमारे सातशे लाख क्विंटल साखर विक्रीअभावी गोदामांमध्ये पडून आहे. तर, दुसरीकडे दुष्काळी स्थितीमुळे पुढील हंगामात साखरेचे उत्पादन निम्म्याहून अधिक म्हणजे 650 लाख क्विंटलने घटण्याची शक्यता आहे. दरम्यान, जून महिन्यानंतर साखरेचे दर वाढतील, असा अंदाज साखर उद्योगात वर्तविण्यात येत आहे.
चालू हंगामात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातही साखरेचे मुबलक उत्पादन झाले आहे. मात्र, बाजारात साखरेला उठाव कमी आहे. केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर 3100 रुपये क्विंटल निश्चित केला आहे; परंतु काही कारखान्यांनी त्यापेक्षा कमी दराने साखर विक्री केल्याची चर्चा आहे.
यंदाच्या हंगामात 1072 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. पुढील हंगामात साखरेच्या उत्पादनात 650 लाख क्विंटलने घट होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे यंदा उत्पादन वाढले, तरी पुढील हंगामातील घट पाहता साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी 68 कारखान्यांना महसुली वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) नोटिसा बजावल्या. त्यानुसार एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) न देणाऱ्या कारखान्यांवर साखर जप्तीची कारवाई होणार आहे. बाजारात साखेरला उठाव नसतानाही एफआरपी देताना बहुुतांश कारखान्यांना तारेवरची कसरत करावी लागली.
महाष्ट्रातील गाळप हंगाम 2018-19 (15 मे 2019 अखेर)
गाळप घेणारे साखर कारखाने 195
ऊस गाळप 952 लाख टन
साखर उत्पादन 1072 लाख क्विंटल
एफआरपी देय रक्कम 22 हजार 172 कोटी
एफआरपी अदा रक्कम 19 हजार 567 कोटी
थकीत एफआरपी 2 हजार 942 कोटी
आरआरसी कारवाई 68 कारखाने
गेली दोन महिने बाजारात साखरेला उठाव नव्हता; परंतु आता परिस्थितीत बदल होईल. राज्यातील साखर कारखान्यांकडे उसाची नोंदणी किती झाली, याची विभागनिहाय माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मराठवाड्यात ऊस उत्पादनात 30 टक्के घट होईल, अशी शक्यता आहे. संपूर्ण माहिती घेऊन अचूक अंदाज सांगण्यात येईल.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.