पुणे - 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर ज्या धर्मांध आणि जातीयवादी शक्तींचा विरोध केला; त्या शक्तींसोबत आघाडी करून तुम्ही त्यांना विजय मिळवून दिला. त्यामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले. प्रकाशराव तुम्ही कोणाला साथ दिली,' असा सवाल माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांना गुरुवारी केला. आज राज ढाले, नामदेव ढसाळ असते, हा विषय घेऊन ते समाजात पेटून उठले असते,' असेही शिंदे म्हणाले.
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने माजी आमदार रमेश बागवे यांना "आंबेडकर-नेहरू मैत्री' पुरस्कार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी डॉ. भालचंद्र मुणगेकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, अभय छाजेड, चेतन तुपे, अरविंद शिंदे, राहुल डंबाळे उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, 'मला तोडाफोडीचे राजकारण करायचे नाही. पण, काय झाले प्रकाशराव तुमच्या विचाराचे? एमआयएम का सोडून गेले तुम्हाला? दुसऱ्याच्या प्रचाराला जाऊच द्यायचे नाही, हे अयोग्य आहे, भविष्यासाठी ठीक नाही.''
प्रा. कवाडे म्हणाले, "धर्मांच्या नावाखाली लोकशाहीला पायदळी तुडविण्याचा प्रयत्न करणारे लोक देशाला विचारशून्यतेकडे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. देशाला संविधान, समता, बंधुतेला आरएसएसरूपी भाजपचे ग्रहण लागले आहे, यातून सुटण्यासाठी मतांचे दान आघाडीला द्या.''
या वेळी बागवे, डॉ. मुणगेकर, पवार, तुपे यांची भाषणे झाली. स्नेहल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. सुवर्णा डंबाळे यांनी स्वागत केले.
दोस्ती बदनाम करू नका - कवाडे
प्रा. कवाडे यांनी मोदी आणि भाजप सरकार टीका केली. ती करतानाच कॉंग्रेसला आघाडीचा धर्म पाळा, असा सल्लाही दिला. ते म्हणाले, "सर्व तूप तुमच्या वाट्याला घेऊ नका. बाकीच्या पक्षांनाही विचारात घ्या. नाहीतर असे होईल की "हम तो डुबेंगे सनम, तुमको भी लेकर डुबेंगे' असा शेर त्यांनी ऐकविला. तेव्हा सभागृहात एकच हशा उसळला. "आम्ही तुमच्यासाठी जान द्यायला तयार आहोत. दोस्ती बदनाम करू नका,' असा सल्लाही कवाडे यांनी दिला.
|