आरोपींबरोबर पोलिसांवरही कारवाई करा 

आरोपींबरोबर पोलिसांवरही कारवाई करा 

पुणे - शेतात शेळी घुसली म्हणून आदिवासी कुटुंबातील महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्याच्या घटनेचे संतप्त पडसाद समाजाच्या विविध स्तरांत उमटले आहेत. याबाबत दोषींना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अन्‌ या घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई व्हायला पाहिजे, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. पुरोगामी राज्यात माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. 

 खासदार सुप्रिया सुळे - आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्याचा प्रकार धक्कादायक आहे. या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. एकीकडे जातीअंतासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे जाती-जातींतील दऱ्या वाढत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कायद्याचा धाक राखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश हेच आहे. 

खासदार दिलीप गांधी - ही घटना समाजाला काळिमा फासणारी आहे. अशा प्रवृत्तींच्या लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. या घटनेचा मी निषेध करतो. 

 आमदार डॉ. नीलम गोऱ्हे - मारहाणीची घटना निंदनीय आहे. या कुटुंबाचे पुनर्वसन झाले पाहिजे. गावात ग्रामरक्षक दल असते, तर ही घटना टळू शकली असती. नगरच्या पोलिसांनी या घटनेमध्ये योग्य ती कारवाई केली पाहिजे. भटक्‍या विमुक्तांसाठी टास्क फोर्स निर्माण करून महिलांसाठी स्वतंत्र विभाग केला पाहिजे. 

प्रा. प्रतिमा परदेशी (सामाजिक कार्यकर्त्या, सत्यशोधक समाज) - आजही दलित, आदिवासींना पोलिसांकडून सुरक्षा मिळेलच, याची खात्री वाटत नाही. मी पीडित महिलेच्या न्यायासाठी ज्या मागण्या आहेत, त्यांना पाठिंबा देते. 

 डॉ. अभिजित वैद्य, (राष्ट्रीय अध्यक्ष, आरोग्य सेना) - आधुनिक काळातही महिलांवर अत्याचार वाढत आहेत. महिलांकडे तुच्छतेने पाहण्याची विकृती पोसली जात आहे. या घटनेतील दोषींना कठोर शासन होईल, यासाठी फास्ट ट्रॅक व्यवस्था निर्माण केली पाहिजे. 

 अवंती टिळेकर (कार्यकर्ता, लोकबिरादरी) - डॉ. प्रकाश आमटे यांच्यासारखे लोक ज्या महाराष्ट्रात आदिवासी लोकांसाठी आपले आयुष्य वेचतात, तिथे ही घटना घडणे म्हणजे अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. 

 किरण मोघे (सामाजिक कार्यकर्त्या) - नगर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये अशा घटना सातत्याने घडत आहेत. तिथे कायदा-सुव्यवस्था राखणारी यंत्रणा कमी पडते आहे. त्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. 

विवेक तमाईचीकर (सामाजिक कार्यकर्ते) - दलित आदिवासींसोबत जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा पोलीस इतके उदासीन का असतात, हा प्रश्न आपण नागरिक म्हणून सातत्याने विचारला पाहिजे. या महिलेसाठी न्याय मिळणे किती कठीण आहे, हेच यावरून स्पष्ट होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com