तळेगाव पुन्हा कचरामय

तळेगाव स्टेशन - यशवंतनगर-कातवी रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा.
तळेगाव स्टेशन - यशवंतनगर-कातवी रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा.

तळेगाव स्टेशन - स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेदरम्यान चकाचक झालेले तळेगाव दाभाडे शहर पुन्हा कचरामय झाले आहे.

कचरा संकलनाच्या कंत्राट नूतनीकरणामुळे कचरा संकलन बंद झाले. त्यामुळे महिनाभरातच शहर कचरामय झाले आहे. कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या नाहीत अन्‌ गाडी येत नाही. त्यामुळे नागरिकांनी साचलेला कचरा उघड्यावर टाकल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेच्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासनाकडून तळेगाव शहराची सर्वांगीण स्वच्छता करण्यात आली.

गतवर्षीच्या कचरा संकलनाच्या कंत्राटदाराची मुदत काही महिन्यांपूर्वी संपली होती. निविदा प्रक्रिया आणि मंजुरीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता, गतवर्षीच्याच कंत्राटदारास मार्चअखेरीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. गेल्या आठवड्यातील सर्वसाधारण सभेत स्थायी समितीकडून नवीन निविदा मंजूर करण्यात आली. मात्र, जुन्या कंत्राटदाराने अचानक काम थांबविल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून कचरा संकलन थांबले आहे. दोन वर्षांपूर्वी कुंडीमुक्ती झाल्याने सध्या तळेगावात एकही कचराकुंडी नाही. त्यामुळे कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

जोशीवाडी रिंगरोड, कातवी रस्ता, चाकण रस्ता, भालेराव कॉलनी, वतननगर, यशवंतनगरसह गाव आणि स्टेशन विभागातील उपनगरांत बहुतेक ठिकाणी उघड्यावर कचरा वाढत आहे. कातवी रस्त्यावरील उतारावर कचरा साचला आहे. जुन्या-नव्या कंत्राटदारांमध्ये कामे हस्तांतरासाठी आठवडाभराचा अवधी लागणार असल्याने पालिका प्रशासनाने आपल्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत कचरा संकलन करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आहे.

चार-पाच दिवस गाडी कचरा घेऊन न गेल्याने घरात भरपूर कचरा जमा झाला. प्रशासनाकडे चौकशी करूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्‍न आहे. पालिकेने स्वच्छता मोहीम राबविली. भिंती रंगवून बॅनर लावून खर्च केला, ती केवळ जाहिरातबाजीसाठीच काय अशी शंका आहे, असे गृहिणी अर्चना काटे यांनी सांगितले.

पालिका प्रशासन आणि स्वच्छता समितीने कचरा उचलण्यासाठी तात्पुरती व्यवस्था केली असून, परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे.
- अरुण भेगडे, सभापती, स्वच्छता समिती

नव्या कंत्राटदाराला कामे हस्तांतरित करून कचरा संकलन पूर्ववत होण्यासाठी किमान एक आठवडा लागणार आहे. पालिका प्रशासनाने पर्यायी व्यवस्था सुरू केली आहे.
- वैभव आवारे, मुख्याधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com