नरवीर तानाजी मालुसरे यांची सिंहगडावर देहसमाधी मिळाली

fort
fort

खडकवासला : सिंहगडावरील महापालिकेच्या माध्यमातून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व पुतळा परिसराचे सुशोभीकरण करताना नरवीरांची देह समाधी मिळाली आहे. नरवीर तानाजी मालुसरे हे धारातीर्थी सिंहगडावर पडले. त्या ठिकाणी देह सोडला. म्हणून तिला धारातीर्थ किंवा देह समाधी म्हणतात. नरवीरांच्या बलिदानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ती समाधी बांधली आहे. त्यास, छत्रपतीचा स्पर्श देखील झाला आहे. यामुळे, प्रथमच छत्रपती शिवरायांच्या काळातील एक ऐतिहासिक ठेवा राज्याला मिळाला आहे. 

पुणे महापालिकेच्या वतीने सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळा, समाधीस्थळाचे सुशोभीकरण आणि स्वराज्य निष्ठा शिल्पाचे काम सुरू आहे. हे काम पुरातत्व, वन विभागाच्या परवानगीने सुरू आहे. स्वराज्य निष्ठा शिल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या कामामध्ये पुतळ्यावरील मेघडंबरी मोडकळीस आल्याने ब्राँझ धातूची मेघडंबरी करणे. मेघडंबरीत पुतळ्याशेजारील समाधी आणण्याचे महापालिकेचे नियोजन होते. 

पुतळा बसविण्यासाठी काँक्रीट चौथरा काढून तेथे दगडी बांधकामातील चौथरा बांधण्याचे नियोजन होते. पुतळा बाजूला काढून ठेवला. त्याच्या काँक्रीटचा ठोकळा काढल्यानंतर त्याच्या खाली एक चौकोनी दगड होता. त्याखाली समाधीचे वृंदावन सापडले. तर, पुतळ्याशेजारी एका चौकोनी दगडावर समाधीचा शिरोभाग होता. ती आता पर्यंत नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी म्हणून ओळखली जात होती. वृंदावन व त्यावरील चौकोनी दगड व त्यावर शिरोभाग अशी जोडणी केल्यावर ही नरवीर तानाजी मालुसरे यांनी मूळ समाधी असल्याचे दिसून आलं आहे. 

नरवीर तानाजी मालुसरे यांनी 1670 मध्ये लढाई करून सिंहगड स्वराज्यात आणला. यात ते धारातीर्थी पडले. ही घटना छत्रपती शिवरायांच्या काळातील आहे. त्यामुळे, शिवरायांनी ही समाधी तयार करून घेतली. त्यांनी स्वतः येऊन त्यावेळी दर्शन घेतल्याचे सांगितले जाते. 

“स्वातंत्र्यापूर्वीच्या एका इंग्रजी पुस्तकात अशा प्रकारे समाधीचा फोटो आहे. त्यामुळे ही नरवीरांची समाधी आहे.” असे इतिहास अभ्यासक पांडूरंग बलकवडे यांनी सांगितले.
त्यानंतर, सिंहगड स्मारक मंडळाने समाधीवर 1938साली या वीर योध्याच्या पराक्रमाची स्मारक शिळा लावल्याचा फलक येथे होता. समाधी शिरोगामीच्या पूर्वेला वीरांचे नरवीरांचे शिल्प आहे. त्यांच्या हातात ढाल तलवार आहे. ढालीवर चार फुले आहेत. त्याच्या दोन्ही बाजूस फुले व मागील बाजूस मारुती दिसत आहे. असे सिंहगडचे अभ्यासक नंदकिशोर मते यांनी सांगितले. तर 20 फेब्रुवारी 1941 साली काँक्रीटचा पुतळा बसविला होता. त्याच्या जागी 24 मार्च 1976 साली मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते ब्राँझ पुतळ्याचे अनावरण केले होते. असे पालिका प्रकल्पाचे शिल्पाचे आर्किटेक्ट राहुल समेळ यांनी सांगितले.

समाधी दिसल्यानंतर पुरातत्व विभागाला सांगितले. सहायक संचालक विलास वाहने यांनी पाहणी केली. समाधी दिसल्यामुळे पुतळा येथे बसविणे योग्य नाही. पुरातत्व च्या सूचनेनुसार ब्राँझ पुतळा बसविणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व 
खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे सुमारे सहा कोटींचा निधी पालिका हद्दीबाहेर वापरता आला. समाधी परिसर काम सुरू असल्याने सध्या बंद आहे. तिथीनुसार नरवीरांची पुण्यतिथी 27फेब्रुवारी 2019 रोजी आहे. त्यापूर्वी आम्ही समाधी परिसर खुला करू. काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना  अधीक्षक अभियंता शिवाजी लंके, उपअभियंता सुनील मोहिते यांना दिल्या आहेत. असे पालिकेचे विरोधी पक्ष नेते दिलीप बराटे यांनी सांगितले. 

नरवीरांच्या पराक्रमाची साक्ष
नरवीर धारातीर्थी पडले ते स्फूर्तीस्थळ मालुसरे यामच्या 349व्या पुण्यतीथीच्या अगोदर उजेडात आले. ही त्यांच्या पराक्रमाची साक्ष आहे. छत्रपती शिवरायांनी स्वतः ही समाधी बांधून घेतली. पूर्ण झाल्यावर समाधीचे दर्शन घेतले आहे. राजे व मावळ्यांची एकमेकांशी असलेली निष्ठा या समाधीमुळे अधिक दृढ झाली. मालुसरे यांच्या मृत शरीराला उमरठ येथे अग्नी दिला त्या ठिकाणी अग्नी समाधी आहे.”
- शीतल मालुसरे, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com