चासकमान धरणातील पाणीसाठा घटल्याने मंदिरांचे दर्शन

चासकमान धरणातील पाणीसाठा घटल्याने मंदिरांचे दर्शन

चास - चासकमान धरणातील पाणीसाठा जवळपास संपुष्टात येऊ लागल्याने जुन्या वाडा (ता. खेड) गावच्या स्मृती पाण्याबाहेर येऊ लागल्या आहेत. लुप्त झालेल्या घरांच्या अवशेषांबरोबरच मंदिरे पाण्याबाहेर येऊ लागल्याने याही वर्षी विस्थापित झालेल्या वाडावासीयांना आपल्या जन्मभूमीला पाहण्याची संधी लाभणार आहे.

चासकमान धरणात १९९२ मध्ये पूर्णक्षमतेने पाणीसाठा करण्यास सुरवात झाल्यावर धरणाच्या जलाशयात हे व्यापारी गाव पूर्णपणे लुप्त झाले. जुना वाडा गाव म्हणजे भामनेर व भिमनेर खोऱ्यातील सुमारे ५२ गावे व वाडीवस्त्यांचे मुख्य व्यापारी गाव. त्या काळात बारा बलूतेदारी पद्धत अस्तित्वात होती. 

ते तांदळाचे मुख्य व्यापारी केंद्र होते. ही मंदिरे हे येथील खास आकर्षण होते. चासकमान धरणाच्या बुडीत क्षेत्रात १९९२ मध्ये वाडा गाव गेल्याने गाव विस्थापित झाले. 

मात्र गावातील आकर्षक अशी दुर्मिळ पाषाणी मंदिरे व गावच्या जुन्या आठवणी मात्र जलाशयात अस्तित्वात राहिल्या. त्या २०१२ मध्ये पहिल्यांदाच पाण्याबाहेर आल्या होत्या. त्यानंतर दरवर्षी मे महिन्यात ही मंदिरे पाण्याबाहेर येण्यास सुरवात होते व आपल्या मायभूमीच्या दर्शनासाठी विस्थापित झालेले हजारो नागरिक येथे गर्दी करू  लागतात. 

चासकमान धरणातील उपयुक्त पाणीसाठा आता दरवर्षीच जवळपास संपुष्टात येत असल्याने जुन्या वाडा गावातील धरणाच्या जलाशयात गडप झालेली ग्रामदैवत धर्मराज मंदिर, मारुती मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, शनी मंदिर, राम मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, गणपती मंदिर, भीमाशंकर मंदिर, दत्त मंदिर ही मंदिरे पाण्याबाहेर येत आहेत. विशेष म्हणजे वर्षातून जवळपास दहा महिने ही  मंदिरे पाण्याखाली असूनही ती सुस्थितीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com