पुणे - एकीकडे शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत असताना दुसरीकडे पारव्यांच्या अनावश्यक वाढलेल्या संख्येने संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढताना दिसत आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे रूग्णांना खोकला, सर्दी व श्वास घेण्यास अडचण होत आहे. हे कमी म्हणून की काय शहरात ठिकठिकाणी पारव्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्या विष्ठामुळे असंख्य जंतू हवेत पसरतात. त्यामुळे फुफ्फुसाचे रोग, अस्थमा अशा प्रकारचे रोग होण्याची शक्यता असते. एखाद्या व्यक्तीला यामुळे अस्थमा किंवा फुफ्फुसाचा रोग झाल्यास त्याची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे विविध प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते. मात्र, पारव्यांमुळे कोरोना पसरतो, असा कोणताही अभ्यास झाला नसून, केवळ इतर संसर्गाची शक्यता वाढू शकते, असे म्हटले जाऊ शकते, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
पारव्यांच्या विष्ठामधील बुरशीमुळे मानवी शरीरात ‘हिस्टोप्लाज्मोसिस’, ‘सिटॅकोसीस’ व ‘क्रिप्टोकोकोसिस’ सारख्या श्वासनाशी संबंधित रोगाचे संसर्ग होतात. त्यामुळे ताप, खोकला, छातीत दुखणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे अशा प्रकारचे लक्षणे आढळतात. यातील काहींची लक्षणे ७ ते १४ दिवसांमध्ये तर काहींची एक ते तीन आठवड्यानंतर आढळतात, अशी माहिती राष्ट्रीय पेशीविज्ञान केंद्राचे (एनसीसीएस) ज्येष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांनी दिली.
अशी कमी करता येईल संख्या
पारव्यांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. मात्र, त्यांना मारण्याऐवजी त्यांची संख्या कमी करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी नागरिकांनीही त्यांच्यासाठी धान्य टाकू नये. तसेच प्रशासनाने असे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला हवी.
- धर्मराज पाटील, पक्षीशास्त्रज्ञ
रास्ता पेठेतील पॉवर हाउस चौकामधील मत्स्यगंधा पुतळा येथे दररोज नागरिकांकडून या पक्ष्यांना धान्य टाकण्यात येत आहे. ते एकत्रित मोठ्या संख्येने उडत असल्याने बऱ्याच वेळा अपघातसुद्धा घडले आहेत. रात्री हे पारवे केईएम रुग्णालयात आसरा घेतात. यामुळे तिथे रुग्णांनाही याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय व आरोग्य कार्यालयात पत्र पाठविण्यात आले आहे.
- प्रकाश परब, सामाजिक कार्यकर्ते
''कोरोना संसर्ग आणि पारव्यामुळे होणारे आजार दोन्ही फुफ्फुसांच्या एकाच भागावर परिणाम करतात. अशातच एकाद्या व्यक्तीला दोन्ही आजार झाले तर रुग्ण अधिक गंभीर होऊ शकतो. तसेच प्रत्येकी १० मधील ६ ते ७ रुग्णांना कबुतरांचा आजार त्यांच्या सोसायटी किंवा घराजवळील कबुतरांमुळे होतो. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.''
- डॉ. संदीप साळवी, छातीरोग तज्ज्ञ
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.