पुणे - खडकवासला तसेच चासकमान धरणांतून शेतीला सिंचनासाठी पाणीपुरवठा करताना अनधिकृत पंप लावून उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
चासकमान धरणातून 15 एप्रिलला सिंचनाचे आवर्तन सुरू झाले. त्याबाबत कालवा समितीची बैठक बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, तसेच महसूल, महावितरण, ग्रामीण पोलिस विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी कालव्याजवळ गस्त घालण्यात येणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता असून, लोकांचा उद्रेक वाढण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
बापट म्हणाले, 'नियोजनानुसार पाणी घेतल्यास सगळ्यांना पुरेसे पाणी मिळू शकते. उपलब्ध पाण्याची मर्यादा लक्षात घेता, सर्वांनी पाणी काटकसरीने वापरावे.'
|