‘टिपनळीचे पाणी’ मावळातून नामशेष

‘टिपनळीचे पाणी’ मावळातून नामशेष

कामशेत, ता. ५ : ऐंशीच्या दशकात गाव कुशा बाहेरच्या विहीर, बारव किंवा झऱ्यातून आम्ही टिपनळीचे पाणी भरून आणायचो. उन्हाळ्याच्या चार महिने कधीच सुखाने झोप घेतलीच नाही. दिवसभर राबराब राबयचो. अन् रात्रीच्या प्रहरी दोन हांडे पाणी भरण्यासाठी तासनतास बसून रहायचो. ता ते दिस गेलं आता सुखाबा आला. दारापुढे नळाला पाणी येत भराभर पाणी भरून शेताच्या कामाला निघून जाता येते हा अनुभव सुरेखा काटकर यांनी सांगितला.
पावसाचे आगार असलेल्या आणि वीजनिर्मितीसाठी धरणे बांधलेल्या धरणाचे काठ पाण्याने भरलेले असताना मावळात टिपनळीचे पाणी सर्रास भरले जायचे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून जूनच्या पाऊस धारा बरसत नाही तोपर्यंत मावळातील गावोगावी टिपनळीचे पाणी भरावे लागते असे, बाया आणि बापडे टिपनळीचे पाणी भरायला तासनतास पाणवठ्यावर बसून रहायचे. आटलेल्या विहिरीत किंवा बारवेतील पाण्याचा पाझर असायचा.
पाझरणारे हेच पाणी खड्ड्यात साचले की, हे पाणी वाटी किंवा पेल्यात घेऊन हांडे भरायचे. यासाठी किती घटका वेळ गेली याचा नेम नसल्याचा अनुभव शेटेवाडीतील मंजुळा शेटे व शोभा शेटे यांनी सांगितला. या काळात पाणवठे रात्रंदिवस गजबजलेले असायचे. जनावरांची तहान सांडपाण्यावर भागायची. पाण्याच्या शोधासाठी आम्ही घरदार सोडून टाटा पॉवरच्या धरण परिसरात नातेवाइकांच्या वावरात येऊन तळ ठोकल्याची आठवण कचरेवाडीच्या सत्यवान कचरे यांना आहे.
ऐंशीच्या दशकात तत्पूर्वी देखील टिपनळीचे पाणी भरलेल्या अनेक सुवासिनी आहेत. त्या आठवणीने आजही मनावर चिरकाल कोरून ठेवलेल्या आहेत. त्याही कष्टात आम्ही खूप समाधानी असल्याचे सिंधूबाई जाधव सांगत होत्या. काळ आणि वेळ बदला.
मावळात सरकारी धरणे बांधली, या धरणासह टाटांच्या धरणातून पिण्यासाठी पाणी पुरवठा योजना गावोगावी पोहचल्याला सुरूवात झाली. जीवन प्राधिकरण स्थापन झाले, आपलं पाणी योजना आली. अनेक सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला. आणि गावोगावी पाणीपुरवठा योजनेतील पाणी घरोघरी पोहचले. लोकसहभाग आणि दहा टक्के लोक वर्गणीतून पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास गेल्या.
वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याची गरज वाढली. कधी काळी टिपनळीचे पाणी भरणाऱ्या माता भगिनींच्या सुखासाठी अनेकांनी आपले कौशल्य पणाला लावले. मावळातून टिपनळीचे पाणी हा शब्दच नामशेष झाला.

‘‘आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून गावोगावी पाणीपुरवठा योजना सुरू आहे. महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला ही आनंदाची व समाधानाची गोष्ट आहे.’’
- सविता भांगरे, सरपंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com