कांद्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत

कांद्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत

आळेफाटा, ता. १४ : कांद्याला योग्य असा बाजार भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला ६ ते १० रुपये प्रति किलो दर मिळत असून, यामधून उत्पादन खर्चही वसुल होत नाही. तसेच, इंधनाचे वाढलेले दर, मजुरी, मशागत या खर्चामध्येही वाढ झाली आहे.


रासायनिक खते तसेच औषधाच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चात गेल्या वर्षीच्या तुलनेने दुप्पट वाढ झाली आहे. सध्या मिळत असलेला बाजारभाव हा अतिशय कमी असून यातून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने कांदा चाळीत साठवून ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती. वाढलेल्या तापमानाचा कांदा पिकाला फटका बसला असून यामुळे काही प्रमाणात उत्पादनात घट झाली. हवामान बदलामुळे कांदा जास्त काळ टिकून राहील की नाही याबाबत शेतकऱ्यांना साशंकता आहे. शासनाने हमी भावाने कांदा खरेदी करावा अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

शेतकऱ्यांना बसतोय फटका
कांदा काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने एकरी १३ ते १५ हजार रुपयाला शेतकऱ्यांना कांदा काढणीचा खर्च येत होता. ३०० रुपये असणारी मजुरी ५०० रुपयांपर्यंत गेल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्चात वाढ झाली. मजुरांना मजुरी बरोबरच प्रवास खर्च द्यावा लागत असल्याने खर्चात वाढ झाली. कांदा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर लागत असल्याने कांदा उत्पादकांना मजूर मिळत नसल्याचा फटका बसत आहे.

गेल्या वर्षापेक्षा चालुवर्षी कांद्याच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली असून झालेला खर्च देखील मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला असून शासनाने उत्पादन खर्चावर हमीभाव देऊन कांदा खरेदी करावा.
- पोपट बढे, कांदा उत्पादक शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com