
वरंध घाटातील वाहतूक पूर्ण बंद
भोर, ता. ६ : मुसळधार पावसामुळे भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील रस्ता खचल्यामुळे आणि दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे घाटातील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद केला आहे. घाटातील धारमंडप येथे आणि घाटरस्ता सुरु होण्याच्या ठिकाणी निगुडघर येथे चेक पोस्ट उभारण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले.
घाटात जाणाऱ्या वाहनचालकांची चौकशी केली जाणार असून, घाटातील गावामधील नागरिकांनाच अतिमहत्त्वाच्या कामासाठी सोडण्यात येणार आहे. प्रशासनाने भोरच्या परिसरातील घाटांमध्ये पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. रात्रीपर्यंत त्यास मंजुरी मिळणार असल्याचेही कचरे यांनी नमूद केले.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वरंधा घाटातील महाडच्या बाजूकडून घाटातील सर्व वाहतूक सोमवारपासून (ता. ४) बंद केलेली आहे. निगुडघर आणि धारमंडप येथे गुरुवारी (ता. ७) सकाळपासून पोलिसांचा बंदोबस्त आणि अत्यावश्यक सेवेसाठीचे पथकही ठेवण्यात येणार असल्याचे तहसीलदार सचिन पाटील आणि पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी सांगितले.
दरम्यान, वरंधा घाटात आणि हिर्डोशी खोऱ्यात पावसाची संततधार सुरु असून, काही प्रमाणात रस्ते वाहून गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घाटातील खचलेल्या आणि भेगा पडलेल्या रस्त्याची दुरुस्तीचे काम सुरु केले आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00319 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..