
मालमत्तांचा लिलाव करून पैसे द्या
बारामती, ता. २७ : ‘‘फसवणुकीच्या व्यवहारात संबंधित व्यक्तीला अटक करण्यापेक्षाही ज्यांचे पैसे धोक्यात येतात, त्यांचे पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने मालमत्तांचा वेगाने लिलाव करून ते पैसे परत करण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत,’’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
बारामतीत माध्यमांशी सुळे यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘‘याबाबत संसदेत मी भूमिका मांडली आहे. बुडीत बँकांबाबत जेव्हा फसवणुकीचा प्रकार घडतो, तेव्हा संबंधिताला अटक होते, ती व्यक्ती जेलमध्ये जाते, मात्र त्याच्या मालमत्तांचा वेगाने लिलाव होत नाही, अनेकदा या मालमत्ता लोक घेत नाही. पर्यायाने ज्यांची फसवणूक झालेली आहे, त्यांचे पैसेही अडकून राहतात. या संदर्भात मी केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती केली आहे की, त्याला अटक करणे न करणे हा कायद्याचा विषय आहे, मात्र पहिले काम त्यांच्या मालमत्ता विकल्या गेल्या पाहिजेत, ते विकून ठेवीदार व गुंतवणूकदारांना पहिल्यांदा पैसे दिले गेले पाहिजेत. ही सर्व प्रक्रीया क्लिष्ट व लांबलचक आहे, ती सुटसुटीत केली पाहिजे. ही बाब त्यांनी मान्य केली असल्याने मी त्यांचे आभार मानते. याबाबत त्या लवकरच काही निर्णय घेतील, अशी मला अपेक्षा आहे.
आगामी अधिवेशनात केंद्राकडे जप्त केलेल्या मालमत्ता विकून किती निधी आला आहे आणि या मालमत्ता विकून सामान्यांचे पैसे का परत दिले जात नाहीत, याबाबत मी प्रश्न उपस्थित करणार आहे.
- सुप्रिया सुळे, खासदार