
अतिवृष्टीमुळे ३५ जनावरांसह वन्यप्राण्यांचा अंत
चास, ता.१९ : खेड तालुक्याच्या अतिदुर्गम पश्चिम पट्यातील येळवळी परिसरात मागील पाच दिवसांमधून अतिवृष्टीमुळे सुमारे ३५ पाळीव जनावरांसह वन्य प्राणीही मृत्यूमुखी पडले आहेत. मुसळधार पाऊस व कडाक्याच्या थंडीमुळे हे मृत्यू झाले असण्याची शक्यता आहे. जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र या ठिकाणी कोणतीही शासकीय मदत वा अधिकारी पोहोचले नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कडाक्याची थंडी पाळीव जनावरांसाठी धोकादायक बनली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. प्रामुख्याने शेताच्या बांधावर, चरण्यासाठी गेलेली जनावरे, पाण्याच्या आसपास असणारी जनावरे मृत्युमुखी पडली असून कडाक्याची थंडी व पाऊस हेच यामागचे कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेत सुरेश डोळस यांच्या तेरा गायी, नऊ बैल, दोन म्हशी, मंगेश सोनवणे यांच्या दोन गायी, दोन बैल, प्रकाश डोळस यांच्या चार गायी, एक रेडा व दोन म्हशी मृत्युमुखी पडल्या आहेत. वनामधील एक सांबर मृत्युमुखी पडले आहे .अशी एकूण ३५ पाळीव जनावरे व एक वन्यप्राणी सांबर मरण पावले आहे.
अधिकारी, पुढाऱ्यांकडून दखल नाही
जनावरांचे पंचनामे करून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. दुभती जनावरे तेही ऐन पावसाळ्यात मेल्यामुळे येथील शेतकऱ्यांवर मोठे अरिष्ट कोसळले आहे. ऐवढी मोठी घटना होऊनही या ठिकाणी ना कोणी शासकीय अधिकारी, महसूल विभागाचा कर्मचारी, ना पशुवैद्यकीय अधिकारी ना पुढारी पोहोचले असून शेतकरी मोठ्या चिंतेत आहे.
भीमाशंकर अभयारण्याचे वनपरिक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून कडाक्याच्या थंडीमुळे वन्यप्राण्याचा मृत्यू झाले आहेत. संबंधित प्राण्याचे शवविच्छेदन केले असता हेच निदर्शनास आले आहे. त्याच्यावर अग्निसंस्कार केले आहेत.
- वसंत चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, भीमाशंकर अभयारण्य
Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00196 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..