
रब्बीसाठी चास कमानचे पहिले आवर्तन सुरू
चास, ता.२६ : खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चास-कमान (ता. खेड) धरणातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन गुरुवारपासून (ता. २२) सोडण्यास सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चालणाऱ्या या आवर्तनात टेल टू हेड पद्धतीने पाण्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती चासकमान पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात दिली आहे. धरणात सद्य स्थितीत ९४.४६ टक्के म्हणजेच ८.१२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
चास-कमान धरण परिसरात चालू वर्षी पावसाळा लांबल्याने डिसेंबर महिना संपत आला तरी धरणातून आवर्तनाची मागणी शेतकऱ्यांकडून झालेली नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वी खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याच्या काही भागात सुरू झालेल्या कांदा लागवडीबरोबरच अन्य पिकांच्या लागवडीसाठी पाण्याची मागणी करण्यात आल्याने चास-कमान पाटबंधारे विभागाच्या वतीने वरिष्ठांच्या आदेशाने धरणातून आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली असून सुमारे ३०० क्यूसेस वेगाने धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. सद्य स्थितीत चास-कमान धरणात ९६.४६ टक्के म्हणजेच ८.१२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षी हाच साठा १०० टक्के इतका शिल्लक होता. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत तो ६.४४ टक्के इतका कमी आहे. सोडण्यात आलेले हे आवर्तन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुरू असून शेतकऱ्यांच्या मागणीवरूनच आवर्तनाचा कालावधी ठरणार असल्याने पाण्याचे वितरण टेल टू हेड पद्धतीने केले जाणार आहे. धरणातील सद्य स्थितीत पाण्याची टक्केवारी चांगली असल्याने उन्हाळ्यातही आवर्तन सोडता येणे शक्य होणार असल्याने शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील पिकांच्या बाबतीतही आशा आहे.
00491