
शिरगाव येथील भगदाडामुळे अपघाताचा धोका
चास, ता.२६ : शिरगांव (ता. खेड) येथील शिरूर-भीमाशंकर राज्यमार्गावरील मोरीपुलाचा कठडा गेल्या पावसाळ्यात वाहून गेला होता. यामुळे पडलेले भगदाड गेली काही महिन्यांपासून तसेच आहे. माती ढासळून त्याचा आकार वाढत असल्याने भगदाड वाहतूकीस धोकेदायक ठरत आहे. माती पोखरलेल्या भागावरून एखादे वाहन गेल्यास जमीन खचून भीमा नदीच्या पात्रात कोसळण्याची शक्यता आहे.
भविष्यात होणाऱ्या अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ते त्वरित बुजविण्याची मागणी वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांकडून होत आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील शिरगांव गावाच्या हद्दीत असलेल्या मोरीपुलाच्या कठडा गेल्या पावसाळ्यात मुसळधार पावसात वाहून गेल्याने रस्त्यालगत असलेल्या या पुलावर भगदाड पडले होते. कठडा तुटल्याने रस्त्याच्या कडेचा भरावाचा भाग पोखरला गेला असून, वाहतुकीस धोकेदायक झाला आहे. मात्र, गेली काही महिन्यांपासून या खड्याचा आकार वाढत असून, आता थेट रस्त्याच्या साइडपटट्टीपर्यंत आला असून, तातडीने या ठिकाणची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. ते न केल्यास मोठा अपघात होवून वित्त व मणुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राम जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की लवकरच या भागाची पाहणी करून त्या भागाची दुरूस्ती केली जाईल.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
सार्वजनिक बांधकाम विभागाने भगदाडाची कोणत्याही प्रकारची दुरूस्ती करण्यास पुढाकर घेत नाही. अपघात होण्याची वाट बघते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार असून भीमा नदीचे पात्र वाहू लागल्यावर हा भाग अजुनही धोकेदायक होणार असून मागील पावसाळ्यात असलेला खड्डा अजून मोठा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
-------------------------
00876