
टोकावडे येथे घरावरील पत्रे उडाले
चास, ता. ३ : टोकावडे (ता. खेड) गावाला गुरुवारी (ता.१) सायंकाळी वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने जबरदस्त तडाखा दिला. यामुळे घरांसह मंदिराचे पत्रे उडाले. उन्हाळी हंगामातील पिकांचेही मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोठेही जीवित हानी झाली नाही.
गेली काही दिवसांपासून खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यावर आकाशात ढगांची गर्दी होत होती. मात्र त्याचे पावसात रूपांतर होत नव्हते. जबरदस्त उन्हाच्या तडाक्याने नागरिक होरपळून निघत होते. पण गुरुवारी सायंकाळच्या वेळी आकाशात ढगांनी गर्दी केली. ढगांच्या गडगडाटासह विजेचा कडकडाट सुरू असतानाच वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याबरोबरच पावसाला सुरुवात झाली. या वादळी वाऱ्याने टोकावडे गावच्या मारुती मंदिराचे पत्रे उडाले व शेडसह दुसऱ्याच्या घरावर पडले. गामाशेठ मऱ्हाडे, तान्हाजी मुऱ्हे, महादू गोपाळे यांच्या घरांचे पत्रे उडाले, काहींची कौले फुटली घरात साठवलेले धान्यही भिजले, बंटी गोपाळे यांच्यासह अन्य एक यांचा साठवलेला कांदा भिजल्याने मोठे नुकसान झाले. शिरगाव येथेही स्वप्नील शिर्के, यमना मुऱ्हे यांची काढण्यास आलेली उन्हाळी बाजरी भुईसपाट झाली. अनेकांची पावसाळ्यासाठी साठवलेली वैरण, पेंढा भिजल्याने नुकसान झाले.
00941