
धर्मांतर करणाऱ्या तिघांची येरवडा कारागृहात रवानगी
दौंड, ता. २७ : दौंड शहरात विवाहित हिंदू तरुणाचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन संशयितांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध अॅट्रोसिटी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दौंड पोलिसांनी आज (ता. २७) या बाबत माहिती दिली.
या प्रकरणातील संशयित आरोपी कुमेल जब्बार कुरेशी (वय ४०), आसिफ अरिफ शेख (वय ३५, दोघे रा. कुंभार गल्ली, दौंड) व सुंता करणारा आझम इस्माईल शेख ( वय ५४, रा. अकबरनगर, औरंगाबाद रोड, नगर) या तिघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
शहरात भीमा नदीकाठी वीट भट्टीत मजुरी करणारे बबलू मिलिंद चव्हाण (वय २८) या तरुणाने मुस्लिम समाजातील विधवा महिलेबरोबर लग्न केल्याने त्यांच्या पत्नीला कुमेल कुरेशी, आसिफ शेख व अन्य काही साथीदारांनी घटस्फोट घेण्यासाठी दबाब टाकला होता. पत्नीने नकार दिल्यानंतर बबलू चव्हाण यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दमदाटी करण्यात आली. परंतु बबलू यांनी नकार दिल्याने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांच्या घरात कुमेल कुरेशी याच्या पुढाकाराने बळजबरीने सुंता करण्यात आली.