
महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार : कटके
केसनंद, ता. ११ : महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सामाजिक भान ठेऊनच बचतगटांना प्रथम प्राधान्य व माता भगिनींना सन्मानपूर्वक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.
वाघोली येथे श्रेयस मंगल कार्यालयात महिला दिनानिमित्त आयोजित महिला बचत गट मेळाव्यात ते बोलत होते. कटके म्हणाले, ‘‘माता भगिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत, या उद्देशाने गेल्या पाच वर्षात अनेक उपक्रम राबविले आहेत. महिलांना छोट्या मोठ्या उद्योगांसाठी प्रोत्साहन देणे, बचत गटाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे तसेच महिलांना संघटित करून त्यांना व्यासपीठ मिळवून देणे यासह महिलांच्या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाहीही या वेळी माऊली कटके यांनी दिली.
या प्रसंगी महिला बचत गटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बचत गटांना तसेच महिलांना सन्मानित करण्यात आले. या वेळी महिला व मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ, नृत्याचे कार्यक्रम, रॅम्प वॉक, उखाण्यांची स्पर्धा, संगीत खुर्ची यासह विविध प्रकारचे मनोरंजक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच सहभागी महिलांना पारितोषिकेही देण्यात आली.