खते, बियाणे विक्रेत्यांना लागवड नियोजनात सहभागी करा

खते, बियाणे विक्रेत्यांना लागवड नियोजनात सहभागी करा

केडगाव, ता. २८ : जिल्ह्यात, राज्यात, देशात किती पिकांची लागवड झाली आहे. याची माहिती व मार्गदर्शन शेतकऱ्याला बियाणे खरेदीपूर्वी मिळाले तर शेतीमालाचे अतिरिक्त उत्पादन किंवा टंचाई भासणार नाही. शेतीमाल दरातील मोठ्या चढ-उताराची छळ ग्राहक व शेतकऱ्यांना बसणार नाही. यासाठी सरकारने गावपातळीवरील खते व बियाणे विक्रेत्यांना लागवड नियोजनामध्ये सहभागी करून घेण्याची गरज आहे, अशी मागणी भीमा पाटस साखर कारखान्याचे माजी संचालक महेश भागवत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भागवत म्हणाले की, सध्या ५०० किलो कांद्याची पट्टी दोन रुपये आली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी खचतो. ही समस्या नित्याचीच आहे. यातून कायमस्वरूपी मार्ग निघाला पाहिजे. देश व राज्याची कोणत्या पिकाची किती गरज आहे आणि ते किती लावले जाते याची माहिती शेतकऱ्यांना नसते. त्यामुळे बाजारभाव, साठवणुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. पीक लागवडीची गरज व एकूण लागवड याचा अंदाज शेतकऱ्याला आला तर तो नक्कीच पीक पद्धतीत बदल करू शकतो. प्रत्येक शेतकरी बी बियाणे, खते खरेदीसाठी दुकानात जातो. पिकाला खतांची गरज असते त्यावेळी शेतकरी खत दुकानात गेल्या नंतर आधारकार्डद्वारे पिकांच्या प्रगतीची नोंद होईल. हे करण्यासाठी सरकारला वेगळी यंत्रणा लावण्याची गरज नाही.

दरम्यान, आकडेवारीचा व्यापाऱ्यांना देखील फायदा होईल. पीक पाहणीची नोंद शेतकऱ्यांनी अॅपव्दारे स्वतः करावी, असे सरकारने ठरवले आहे. मात्र, अनेक शेत शिवारात मोबाईलची रेंज नसते. काही शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत, काहींना स्मार्ट फोन वापरता येत नाहीत. यामुळे विक्रेत्यांना नियोजनात सहभागी करून घेतल्यास सर्वांना फायदा होईल.'''' असेही भागवत यांनी नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com