
उरुळी कांचनला नगरपालिका करा
लोणी काळभोर, ता. १८: हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे रूपांतर नगरपरिषदेत, तर लोणी काळभोर, कदमवाकवस्ती (ता. हवेली) आणि शिक्रापूर व सणसवाडी (ता. शिरूर) या गावांचा नगरपंचायतीत समावेश करावा, अशी मागणी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केली आहे.
आमदार पवार यांनी वरील ५ गावांच्या विकासासाठी मुंबई येथील नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना याबाबत निवेदन दिले आहे. याबाबत अशोक पवार म्हणाले, उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, शिक्रापूर आणि सणसवाडी या ५ गावांच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी त्यांचे रूपांतर नगरपरिषदेत आणि नगरपंचायतीमध्ये होणे गरजेचे आहे. हा निर्णय झाल्यास शासनाकडून मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध होणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
वाढते नागरिकीकरण
उरुळी कांचन ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३० हजार ३०५, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची लोकसंख्या १९ हजार ३२९, लोणी काळभोर ग्रामपंचायतीची लोकसंख्या २२ हजार ५१८ आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ग्रामपंचायतीची लोकसंख्या २० हजार २६३ तर सणसवाडी ग्रामपंचायतीची लोकसंख्या १३ हजार ५४३ आहे. या ५ गावांमध्ये मोठया प्रमाणात नागरीकरणात वाढ होत आहे.