
शिवरायांच्या विचारांची जपणूक करावी
मंचर, ता. ३० : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्व जाती धर्मांच्या बांधवांना बरोबर घेऊन राष्ट्रीय एकात्मतेची बीजे रोवली. त्यांनी नैतिकता व कर्तव्याला नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे महाराष्ट्राचे नाव देशाच्या कानाकोपऱ्याप्रमाणेच जागतिक स्तरावर पोचले आहे. महाराजांच्या विचारांची जपणूक आजच्या तरुण पिढीने करावी, असे आवाहन शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.’’
मंचर (ता. आंबेगाव) येथे शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवांतर्गत लोकनेते किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सदस्या पूर्वा वळसे पाटील, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सचिन गाडे, अरुणा थोरात, सुषमा शिंदे, मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पास्टे, वंदना बाणखेले, दत्ता थोरात उपस्थित होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व लोकनेते किसनराव बाणखेले यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या, ‘‘४० वर्षापूर्वी मंचरच्या मुख्य वेशीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात आले. महाराजांचे विचार सर्वांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारे आहेत. हे विचार रुजावेत म्हणूनच लोकनेते दिवंगत किसनराव बाणखेले यांनी ३६ वर्षापासून येथे व्याख्यानमाला सुरू केली. ही व्याख्यानमाला अविरत सुरु राहण्यासाठी मंचरकर घेत असलेली मेहनत कौतुकास्पद आहे.”
शेरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व व्याख्यानमालेचे संस्थापक माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या कामकाजाचा गौरव केला. डॉ. सचिन गाडे यांचे भाषण झाले. व्याखानमालेचे संयोजक कामगार नेते अॅड बाळासाहेब बाणखेले यांनी प्रास्ताविक केले. वसंतराव बाणखेले यांनी सूत्रसंचालन केले.
Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03210 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..