
नितीन गडकरी व चंद्रकांत पाटील यांना भाजपचे निवेदन
मंचर, ता. १० : निघोटवाडी (ता.आंबेगाव) येथील उड्डाणपुलाला लोकनेते माजी खासदार (स्व) किसनराव (अण्णा) बाणखेले, पुणे-नाशिक बाह्यवळण रस्त्याला देशभक्त माजी आमदार अण्णासाहेब आवटे महामार्ग व एकलहरे येथील उड्डाणपुलाला देशभक्त हुतात्मा बाबूगेनू सैद यांचे असे नाव देण्याची मागणी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय थोरात यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी केंद्रीय वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले आहे. गरीब शेतकरी कुटुंबातील किसनराव बाणखेले यांनी लोकवर्गणीतून निवडणुका लढविल्या. मंचरचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, तीन वेळा आमदार व खासदार या पदावर त्यांनी समाजभिमुख काम केले आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी जिवाची पर्वा न करता देशभक्त बाबू गेनू यांनी बलिदान दिले. अण्णासाहेब आवटे यांचे आंबेगाव तालुक्यात शिक्षण, आरोग्य व अन्य सुविधांसाठी मोठे योगदान आहे. असे निवेदनात नमूद केले आहे. निघोटवाडी पुलाखालील चौकाला श्री मुंजोबा महाराज चौक नाव देण्याची मागणी निघोटवाडी ग्रामपंचायत सदस्या उषा संजय चिंचपुरे यांनी केली आहे.