

मंचर, ता. ३ : ‘‘आपल्या चारही तालुक्यांमध्ये बिबट्यांची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी ब्लँकेट परमिशन, २०० नव्या पिंजऱ्यांची व्यवस्था, २०० क्षमतेचे निवारा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सध्या मंजुरीसाठी दिल्लीला पाठवला आहे. ती मंजुरी लवकर मिळेल, यासाठी आम्ही दिल्लीशी समन्वय साधत आहोत. तातडीच्या घटनांवर त्वरित प्रतिसाद मिळावा म्हणून विशेष हेल्पलाइन सुरू केली जाणार आहे. पकडलेल्या बिबट्यांना बाहेर सोडणार नाही, बंदिस्त ठेवले जाईल,’’ असे पुणे विभागाचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी सांगितले.
आशिष ठाकरे सोमवारी (ता. ३) रात्री आठ वाजता आंदोलनस्थळी आले. यावेळी इतर शेतकऱ्यांनी पिंजरे अपुरे असल्याची, पकडलेल्या बिबट्यांना परत वस्ती जवळ सोडण्याच्या प्रकाराचा तीव्र निषेध केला. ‘आमच्या लेकरांचा जीव वाचवा, बिबट्यांचा बंदोबस्त करा,’ अशा मागण्या आक्रमकपणे आंदोलकांनी केल्या. महिला शेतकरी कल्याणी बोंबे म्हणाल्या, ‘माझं लेकरू वाघाच्या पिंजऱ्यात ठेवलं गेलंय. रोज शेतात जाताना मृत्यूची भीती वाटते. आम्हाला फक्त आश्वासनं नकोत, कृती पाहिजे. रात्रीच नाही, आता दिवसासुद्धा बिबट्यांचे दर्शन होत आहे. शेतीत काम करायला भीती वाटते. पाळीव प्राणी, जनावरं व लहान मुलं असुरक्षित आहेत. आम्ही जगायचं कसं, याचं उत्तर आम्हाला पाहिजे.’
ठाकरे यांनी नागरिकांना शांत करत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. ते म्हणाले, ‘‘आपल्या भावना मी पूर्णपणे समजतो. मी स्वतः दोन मुलींचा बाप आहे, तुमची वेदना मी जाणतो. आपण जे मांडले तेच आम्ही मंगळवारी (ता. ४) मंत्रालयात होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत मांडू. तुम्ही केलेल्या ११ मागण्यांचे एक तासाच्या आत मी तुम्हाला लेखी उत्तर देतो.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.