
हरिश्चंद्री फाट्यावर भुयारी मार्ग होणार
नसरापूर, ता. ४ ः हरिश्चंद्री (ता. भोर) गावच्या फाट्यावर पुणे- सातारा महामार्ग पार करण्यासाठी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल करावा या मागणीसाठी अनेक वर्ष लढा देणाऱ्या हरिश्चंद्री ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. महामार्ग पार करण्यासाठी भुयारी मार्ग होत असून त्याचे भूमीपूजन राजगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते झाले.
ढोल ताशांच्या गजरात झालेल्या या कार्यक्रमाला हरिश्चंद्रीच्या सरपंच संध्या गाडे, किकवीच्या मंडलाधिकारी मनिषा भुतकर, महामार्ग प्राधिकरणाचे गुलाब श्रीखंडे, रिलायन्स इन्फ्राचे राकेश कोळी, भगीरथ घुले आदी मान्यवर उपस्थित होते.
महामार्गाचे सहापदरीकरण होत असताना प्रवाशांच्या सोयीसाठी महामार्ग मोठा झाला, परंतु हरिश्चंद्री ग्रामस्थांना हा महामार्ग ओलांडण्यासाठी रस्ताच नसल्याने मोठी अडचण झाली होती. गावातील सर्वच शेतकऱ्यांची शेती महामार्गाच्या पलीकडे असल्याने शेतीच्या कामासाठी व गुरे शेतात नेण्यासाठी जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत होता. यामुळे अनेक अपघातदेखील झाले. याप्रश्नी ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरण व राजकीय नेत्यांकडे अनेक पाठपुरावा केला. तहसिल कचेरी समोर उपोषण, रास्ता रोको आंदोलन केले. पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करूनही मार्ग निघाला नव्हता. दरम्यान, राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी ग्रामस्थांच्या मागणी बाबत पुणे सातारा- महामार्गावर प्रकल्प संचालक म्हणून नव्याने आलेले संजय कदम यांच्याकडे ठोस भूमिका मांडली. कदम यांनीदेखील प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून याबाबत दिल्ली कार्यालयाशी चर्चा करून भुयारी मार्गाला मंजुरी मिळवली.
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणार
पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले की, हरिश्चंद्री गावच्या फाट्या जवळच महामार्गावर हा तीन मिटर रुंद व साडेतीन मिटर उंचीचा भुयारी मार्ग होत आहे. पावसाळ्याच्या अगोदरच हे काम पूर्ण करण्याचा निर्धार महामार्ग प्राधिकरणाने केला आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01339 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..