
किकवीतील सराफावर फसवणुकीचाही गुन्हा
नसरापूर, ता. १८ : दुचाकी अपहार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला सराफ व्यावसायिक ज्योतिराम सूर्यकांत टाक (वय ४९, रा. बीड, सध्या रा. किकवी, ता. भोर) याच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी देखिल गुन्हा राजगड पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.
टाक याचे किकवीमध्ये ‘माऊली ज्वेलर्स’ हे सराफी दुकान असून, त्याने ओळखीच्या व्यक्तीची दुचाकी घेऊन पलायन केले होते. त्या घटनेत त्याला अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान त्याच्या अटकेमुळे त्याच्याकडून फसवणूक झालेले अनेक लोक पोलिस ठाण्यात येऊन तक्रार करू लागले आहेत. यामध्येच २० सप्टेंबर २०२१ रोजी त्याला फिर्यादी माणिक नारायण आवाळे (रा. मोरवाडी, ता. भोर) याने दहा ग्रॅम सोन्याची चैन मोडून दोन तोळे वजनाची नविन सोन्याची चैन बनविण्यासाठी ३० हजार रोख रक्कम दिली होती. मात्र, टाक याने नवीन सोने न देता पलायन केले होते. आवाळे यांच्या या फिर्यादीनंतर दुसरा गुन्हा टाक याच्यावर दाखल केला आहे.
दरम्यान, टाक याला औरंगाबाद-जालना सीमेवर पकडल्याची वार्ता पसरताच सोन्याच्या व्यवहारात फसवणूक, उसने पैसे घेणे, भिशीतील पैसे न भरणे अशा अनेक तक्रारी असलेल्या तक्रारदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यामधीलच आवाळे यांची तक्रार दाखल झाली असून, अजून काही लोकांची आर्थिक फसवणूक झाल्यास राजगड पोलिसांनी तक्रारी करण्याचे आवाहन केले.