
तोडलेला ऊस बाहेर काढताना दमछाक
गुनाट, ता. २३ : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे जळालेला ऊस... गुऱ्हाळाला घालवण्यासाठी शेतकऱ्यांची दोन दिवस चाललेली तळमळ... विनवण्या करून प्रतिटन १३०० रुपयांचा मिळालेला बाजारभाव... दुर्दैवाने ऊस तोडणी करताना झालेला मुसळधार पाऊस. यामुळे गुनाट (ता. शिरूर) येथील गोरडे बंधूंना तोडलेला ऊस दोन चार ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढताना मोठी दमछाक झाली. एवढेच नाही तर त्यांच्या शेताचेही मोठे नुकसान झाले.
गुनाट येथे सोमवार (ता. २०) सायंकाळी महावितरणाच्या तारांच्या संघर्ष होऊन गोरडे बंधूंचा बारा महिन्यांचा पूर्ण वाढ झालेला पाच एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यात जवळपास आठ लाखांचे नुकसान झाले. मात्र या वर्षीच्या ऊस हंगामात याच उसाला एफआरपीप्रमाणे बाजारभाव मिळून दोन जास्तीचे हक्काचे मिळाले असते. शिवाय उसाच्या टनेजमध्येही वाढ झाली असती. मात्र आता त्यांच्या साऱ्या मेहनतीवर पाणी पडले आहे. सद्यपरिस्थितीत केवळ १३०० रुपये प्रतिटन बाजारभाव मिळाल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. शिवाय पावसामुळे शेतातून ऊस बाहेर काढताना दोन चार ट्रॅक्टरची गरज भासत आहे, त्यासाठीही वेगळा खर्च करावा लागत आहे. वाहतुकीमुळे ऊस शेतीचे मोठे नुकसान झाल्याने सुरु ऊस मोडून काढण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे त्यांना खोडवा उसाच्या उत्पन्नालाही मुकावे लागणार आहे.
योग्य बाजारभावाअभावी सद्यपरिस्थितीत शेती ही बेभरवशाची राहिली आहे. त्यात आता नैसर्गिक आपत्तीबरोबरच महावितरणच्या आपत्तीचे संकट उभे राहिले आहे.उसाच्या आर्थिक उत्पन्नातून अनेक गोष्टींचे नियोजन केले होते, मात्र आता आमच्या स्वप्नांवर पाणी सोडावे लागले आहे. अशा प्रकारांमुळे शेतकऱ्यांची मानसिक अवस्था काय होत असेल याचा प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे.
- श्यामकांत गोरडे. बाधित, ऊस उत्पादक शेतकरी.
73115
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22m83037 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..