चासकमानमध्ये अत्यल्प पाणीसाठा

चासकमानमध्ये अत्यल्प पाणीसाठा

गुनाट, ता. १३ ः चासकमान धरणात केवळ वीस टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यात धरणात पिण्याच्या पाण्यासाठी राखीव पाणीसाठा ठेवण्याचे धोरण असल्याने चासकमानचे आवर्तन कधीही बंद होण्याची शक्यता आहे. चासकमानचे पाणी अद्याप टेलला न पोचल्याने पाणी नेमके येणार आहे की नाही या विचाराने निमोणे, गुनाट, मोटेवाडी, निर्वी, आदी टेलच्या गावातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. चासकमानचे पाणीवाटपाचे धोरण याही आवर्तनात डळमळीत झाले आहे. केवळ दुसरे आवर्तन असूनही मे महिन्यात सुद्धा अद्याप या आवर्तनाचे पाणी टेलला आले नाही. या भागातील बहुतांशी तळी, तलाव पाण्याभावी कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेतीसाठी असणाऱ्या पाणीपुरवठा योजना ही ठप्प झाल्या आहेत.
परिणामी शेतातील पिके शेवटची घटका मोजत आहेत. तर पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे हे आवर्तन लांबत असून चासकमानचे पाणी टेलला नेमके कधी येणार याविषयी खुद्द चासकमानचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्येच संभ्रमावस्था आहे.

कालवा सल्लागार समितीचे नेमके चाललंय काय?
चासकमानच्या पाणीवाटपाचे नियोजन कालवा सल्लागार समिती करत असते. मात्र, हे नियोजन नेमके कसे असते याची कुठलीच कल्पना शेतकऱ्यांना नसते. त्यामुळे यावर्षी चासकमान १००% भरले. मात्र, ऐन उन्हाळ्यात नियोजनाअभावी आवर्तन लांबत चालल्याने उन्हाळा संपून पावसाळा तोंडावर आला तरी पाणी आले नसल्याने या समितीच्या कार्यपद्धतीवरच शंका उपस्थित होत आहे.


पिके डोळ्यादेखत जळून चालली आहे. रोज पाण्याची वाट पाहतोय. पाण्यासाठी पाणीपट्टीही भरल्या. वेळेवर पाणी मिळत नसल्याने शेती करावी की करू नये हाच मोठा प्रश्न आहे. पाण्याभावी शेतमालाची ना शासनाला काळजी आहे ना चासकमान प्रशासनाला.
-बबन गव्हाणे, शेतकरी, गुनाट.

42651

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com