रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे पिकांवरही संकट

रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे पिकांवरही संकट

पौड, ता. १७ : चांदणी चौकातून कोकणाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे जामगाव (ता. मुळशी) येथे तब्बल दहा मोऱ्यांचे काम अर्धवट अवस्थेत पडून आहे. पावसाळा तोंडावर येवून ठेपला असतानाही काम पूर्ण न झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पिकाचे आणि बांधबंदिस्तीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. येथे उभारलेल्या खडीमशीन व रेडीमिक्स मशिनरी प्लांटमुळे परिसरातील सुमारे दहा एकर शेती नापिक झालीच. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे आता येथील पिकांवरही संकटाचे काळे ढग पसरणार आहे.
जामगाव हे डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्यांची भातखाचरे आहेत. तथापि पावसाळ्याच्या काळात डोंगरावरून ठिकठिकाणाहून पाणी वाहत रस्त्यावर, शेतात येते. या पाण्याला थेट नदीपर्यंत पोचविण्यासाठी रस्त्याला मोऱ्या काढल्या जातात. डोंगरावरील प्रवाहित पाण्याचा वाट मिळाल्याने शेताची बांधबंदिस्ती सुरक्षित राहते. जामगावला दिसलीपासून ते शेरेगावच्या हद्दीपर्यंत दहा ठिकाणी अशा मोऱ्या बांधल्या आहेत. परंतु, राष्ट्रीय महामार्गाच्या मजबुतीकरणाच्या कामात जामगावला या मोऱ्यांच्या एकाच बाजूचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूचे काम गेली चार वर्षांपासून धुळखात पडले आहे. मोऱ्यांच्या दुसऱ्या बाजूची संरक्षक भिंत उभारण्यासाठी टाकलेले लोखंडी सळई गंजून गेल्या असून, त्या रस्त्याच्या दिशेने वाकड्या तिकड्या पसरल्या आहेत. मोऱ्यांचे पाइपही दगडमातीने बुजले गेले आहेत. एकाच बाजूचे काम झाल्याने यावेळीही डोंगरावरून वाहून येणारे पाणी एकाच बाजूला आडून शेतकऱ्यांच्या शेतात घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांचे आणि खाचराच्या बांधबंदिस्तीचेही मोठे नुकसान होऊ शकते.
जामगाव येथे कंपनीने डांबरनिर्मिती, खडीमशीन, रेडीमिक्स मशिनरी प्लांट उभारलाय. कंपनीचे येथे खाणकामही चालू होते. याठिकाणी सुमारे चारशे ते पाचशे कामगार विविध प्रकारचे काम करीत होते. डांबर, खडीमशीन तसेच डस्ट तयार करण्यासाठी लागणारे पाणी वापरानंतर जवळच्या शेतात सोडले जात होते. या रासायनिक पाण्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील सुमारे दहा एकर शेती नापिक झाली. खडीमशीनच्या दररोज कामामुळे या भागातील ग्रामस्थांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. खाणीसाठी येथे मोठ्या प्रमाणात ब्लास्टींगही केले गेले. त्याचे मोठाले दगडी घराच्या, पोल्ट्रीच्या पत्र्यावर पडल्याने शेतकऱ्यांचे यापूर्वी अतोनात नुकसान झाले होते. सध्या हा प्लांट बंद पडलाय. आता मोऱ्यांच्या अर्धवट कामामुळे पावसाळ्यात डोंगराचे पाणी थेट शेतात तुंबून पीक आणि बांधाचेही नुकसान होणार आहे. अर्धवट मोऱ्यांची कामे पावसाळ्यापूर्वी रस्ते विकास महामंडळाने पूर्ण करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे महामार्गाचे काम गेली पाच वर्षांपासून अर्धवट आहे. जामगावला त्याचा मोठा फटका बसला आहे. येथील प्लांटमुळे गेली तीन वर्षांपासून शेती नापिक आहे. जी शेती पिकाखाली आहे, तीदेखील मोऱ्यांच्या अर्धवट कामामुळे पिकू शकत नाही. या अर्धवट कामाचा तोटा शेतकऱ्यांना अजून किती काळ सहन करावा लागणार?
- रामचंद्र ठोंबरे, माजी अध्यक्ष, जिल्हा दूध संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com