महामार्गाची वाहतूक तीन वर्षांपासून एकेरी

महामार्गाची वाहतूक तीन वर्षांपासून एकेरी

लोगो : मुळशीकरांच्या मृत्यूचा सापळा


बंडू दातीर : सकाळ वृत्तसेवा
पौड, ता. २६ : मुळशी तालुक्यातून कोकणाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सुतारवाडी आणि दारवली येथे केवळ एकेरी मार्गाचेच काम झाले आहे. उर्वरित दुसऱ्या मार्गाचे काम गेली तीन वर्षांपासून रखडले आहे. एकेरी मार्गामुळे याठिकाणी अपघात होऊन लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. तर, कित्येकजण जायबंदी झालेत. त्यामुळे याठिकाणी दुसऱ्या मार्गाचे काम कोणत्या मुहूर्तावर सुरू होणार? हा प्रश्न मुळशीकरांना पडला आहे.
कासारआंबोली वळण ते सुतारवाडीपर्यंत सुमारे एक किलोमीटर अंतरावर केवळ एकेरी रस्ताच झाला आहे. उर्वरित दुसरा मार्गाचे काम करण्यास गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाला मुहूर्त सापडला नाही. एकेरी रस्त्याच्या कामामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक अर्ध्या रस्त्यामधूनच होते. त्यात कासारआंबोलीच्या राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेजवळ अतिशय धोकादायक वळण आहे. याच वळणावर यापूर्वी कित्येकवेळा चारचाकींची समोरासमोर धडक झाली आहे. तसेच, दुचाकीही चारचाकीला धडकून दुचाकीवरील प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय. तर, काहीजण गंभीर जखमीही झाले आहेत. सुतारवाडी गावाजवळही मोठ मोठे खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. गावापासून ते दत्तमंदिरापर्यंतच्या अर्धा किलोमीटरचा रस्त्यांवर खड्ड्यांनी विळखा घातला आहे. याठिकाणी चारचाकी चालविताना चालकांना ‘डान्सिंग कार’चा अनुभव येतो. येथे कोणता रस्ता चुकवावा, हाच चालकांना प्रश्न पडतो. खड्डा चुकविताना तोल जाऊन यापूर्वी अनेक दुचाकीचालक जखमी झाले आहेत.
दारवली येथेही उतार रस्त्याचे तीन वर्षांपूर्वीच केवळ एकेरी मार्गाचे काम झाले आहे. सुतारवाडी घाटातून रस्ता उतरताना येथे गाड्यांना वेग असतो. परंतु, पुढे एकेरी मार्गामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कित्येकवेळा कच्चा रस्त्यात गाड्या पडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. दारवली येथे ओढ्यावर मोरी बांधण्याचे कामही अर्धवट अवस्थेत पडून आहे. त्यामुळे अर्धवट रस्त्यावर दुहेरी वाहतूक धोक्याची होऊ लागली आहे. रात्रीच्यावेळी सर्रास अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत.

प्रशासनाचे वेळकाढू धोरण
सुतारवाडी आणि दारवली येथील दुहेरी मार्गाचे काम करण्याबाबत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदार काणाडोळा करीत असल्याचे चित्र आहे. याबाबत स्थानिक नागरिक, विविध पक्षांचे प्रतिनिधी यांनी ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना निवेदने दिली. त्यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. परंतु, रस्त्याचा दुसरा मार्ग करण्याबाबत त्यांचे वेळकाढू धोरण सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग करण्यास ‘एमएसआरडीसी’ कोणता मुहूर्त शोधत आहे, हाच प्रश्‍न मुळशीकरांना पडला आहे.

कासारआंबोली वळण ते आमच्या सुतारवाडी गावापर्यंत महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली. एकेरी काम आणि खड्डे यामुळे प्रवाशांबरोबरच आमचे रहिवासीही पुरते वैतागलेले आहेत. याबाबत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांना खड्डे बुजविण्याची मागणीही ज्येष्ठांसह युवकांनीही केली आहे. निवेदन देवून पंधरा दिवस होऊन गेले तरी खड्डे बुजविण्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.
- विलास अमराळे, माजी उपसरपंच, अंबडवेट (ता. मुळशी)

सुतारवाडी (ता. मुळशी) : गेली तीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असलेला महामार्ग
दारवली (ता. मुळशी) : एकेरी महामार्गामुळे ये जा करणाऱ्या वाहनांना करावी लागणारी कसरत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com