मुळशीतील पुलांचे काम अर्धवट अवस्थेत

मुळशीतील पुलांचे काम अर्धवट अवस्थेत

पौड, ता. २८ : मुळशी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सात ठिकाणच्या ओढ्यावरील पुलाचे आणि पाच ठिकाणच्या मोऱ्यांचे काम दोन्ही बाजूंनी अर्धवट अवस्थेत पडून आहे. पूल आणि मोऱ्यांच्या कामांसाठी लावलेल्या लोखंडी सळया गंजल्या असून त्या प्रवाशांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी अर्धवट पुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे.
पुलांच्या अर्धवट कामाचा देखावा भूगावपासूनच सुरू होतो. भूगावच्या पश्चिमेला वाहणाऱ्या दक्षिणोत्तर ओढ्यावरील पुलाचे एका बाजूचे अर्धवट काम केले गेले आहे. त्यामुळे इथे रस्ता अरुंद झाला आहे. हे अर्धवट कामही खचले असून एका बाजूला त्यास भगदाड पडले आहे. लवळेफाट्याच्या पुढे मोरीचे कामकाज अर्धवट अवस्थेत आहे. इथेही रस्त्याला खड्डे पडले आहे. पिरंगुट गावच्या पुढे असलेल्या ओढ्यावरील पुलाचे राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे या पुलावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना याठिकाणी मोठी कसरत करावी लागते.
सुतारवाडीजवळही रस्ता खड्डेमय असून येथील मोरीचे कामकाज अर्धवट अवस्थेत आहे. दारवलीजवळही ओढ्यावरील पुलाचे काम एकाच बाजूने अर्धवट अवस्थेत पडून आहे. याठिकाणी उताराची वाहतूक असल्याने संरक्षक कठड्याअभावी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पौडजवळही पुलाचे काम दोन्ही बाजूने अर्धवट अवस्थेत आहे. येथे विठ्ठलवाडीच्या डोंगरातून वाहत येणारे पाणी मुळानदीला मिळते. पुलाच्या संरक्षक भिंतीचे काम झाले नाही तर ओढ्याचे पाणी यावर्षी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. पौडच्या पुढे असलेल्या मोरीचे कामही अर्धवटच आहे. कोंढावळे गावच्या हद्दीत ओढ्यावरील पुलाच्या लोखंडी सळ्या कामाअभावी गंजल्या आहेत.
अकोले, शेरे, जामगाव, दिसली येथेही ओढ्यावरील पुलाचे काम गेली तीन वर्षांपासून अर्धवट राहीले आहे. पूल किंवा मोरीच्या कामासाठी संरक्षक भिंती बांधलेल्या नाहीत. संरक्षक भिंतीसाठी लावलेल्या लोखंडी सळ्या पूर्णपणे गंजल्या आहेत. त्या वाकड्यातिकड्या रस्त्याकडेला झुकलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्याच्याकडेने चालत जाणाऱ्या पादचाऱ्याच्या जीवितालाही धोका आहे. त्याचप्रमाणे संरक्षक कठडे नसल्यामुळे रात्री, अपरात्रीच्यावेळी रस्त्याचा अंदाज न आल्यास दुचाकी, चारचाकी गाड्या थेट ओढ्या, नाल्यात कोसळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गंजलेल्या लोखंडी सळया लागून मोठी दुर्घटनाही होवू शकते. त्यामुळे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने ओढ्यांवरील पुलाचे कामकाज तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.


पावसाळ्यात विठ्ठलवाडीच्या डोंगरातून वाहत येणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोठा असतो. ओढ्यावर बांधलेला पूल दोन्ही बाजूने अर्धवट अवस्थेत आहे. दोन्ही बाजूला संरक्षक भिंती नाहीत. त्यामुळे यावर्षी पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतो. पावसाळ्यापूर्वीच या पुलावरील दोन्ही बाजूला संरक्षक कठडे बांधण्याची आवश्यकता आहे.
-अजय कडू, सरपंच, पौड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com