दिलखुलास व्यक्तिमत्त्व

दिलखुलास व्यक्तिमत्त्व

दिलखुलास व्यक्तिमत्त्व

इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील शेतकरी कुटुंबामध्ये १ जून १९६८ मध्ये जन्मलेल्या दत्तात्रेय (मामा) भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते इंदापूर तालुक्याचे आमदार ते राज्याच्या सात खात्यांचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदापर्यंतचा राजकीय प्रवास आजच्या तरुणपिढीसाठी निश्‍चित प्रेरणादायी आहे.

- राजेंद्र गोलांडे, संचालक, पुणे जिल्हा सहकारी बोर्ड

बालपणापासूनच निष्ठेने, तत्परतेने आपले काम पूर्ण करीत असताना ज्या कारखान्याला आपल्या शेतातील ऊस जातो, त्या कारखान्याचे संचालक होण्याचे स्वप्न दत्तात्रेय मामा भरणे यांनी बघितले आणि सत्यात उतरवलेही. त्यानंतर सन १९९६ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवून बँकेवर संचालक म्हणून निवडून गेले. सन २००१ ते सन २००२ या काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद भूषविले. तसेच, भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखाची निवडणूक लढवीत सन २००२ ते सन २००५ या कालावधीत कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले. या काळात दांडगा जनसंपर्क ठेवला. त्यानंतर त्यांच्या रूपाने इंदापूर तालुक्याला पहिल्यांदा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यांनी सन २०१२ पासून अडीच वर्षे अतिशय सखोल अभ्यास करून जिल्हा परिषदेमार्फत राबवली जाणारी विविध विकास कामे, वैयक्तिक लाभाच्या योजना इंदापूर तालुक्यात घरा घरात पोचवल्या. यावेळी अनेक योजना यशस्वी करत असताना गरीब आणि गरजू अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त आदी घटकांना विविध योजनेमधून लाभ मिळवून दिला. या कामामुळे त्यांनी आपले स्थान घराघरांतील लोकांच्या मनात निर्माण केले. त्यानंतर सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळवीत ते विधानसभेत पोचले.

पहिल्यांदाच विधानसभेमध्ये गेल्यानंतर मामांनी विविध योजनांचा अभ्यास करत आपल्या मतदारसंघात नेमके काय करावे लागेल, यांचे ज्ञान अवगत केले. त्यामुळेच आपल्या पंचवार्षिक कालखंडात तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात त्यांना यश आले. या कालावधीमध्ये युतीचे सरकार होते. तरीही विरोधी पक्षातील आमदार असूनही त्यांनी चमकदार कामगिरी केली. प्रत्येक रविवारी त्यांच्या घरी मिनी जनता दरबार भरतो. आलेल्या प्रत्येक व्यक्तीची अडचण काय आहे, हे समजून घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचा त्यांचा स्वभाव सर्वसामान्य नागरिकांना मोहात पाडल्याशिवाय राहत नाही. भेटायला आलेल्या व्यक्तीला समाधानी भावनेनेच ते परत पाठवतात, कधी कधी खूप गर्दी असली, तर समोरच्या व्यक्तीशी बोलत असतानाच त्यांचे लक्ष दाराच्या बाहेर असलेल्या व्यक्तीवर असते. तालुक्यात विविध उद्घाटने, भूमीपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम आदींची रेलचेल, असताना ‘त्या’ शेवटच्या व्यक्तीचे काम मामांच्या आठवणीत असते. स्वतः त्या व्यक्तींपर्यंत जाऊन त्याची विचारपूस करण्यास मामा कुठेही कमी पडत नाहीत. जनता दरबारात मामा झपाटल्यासारखे वावरत असतात. एखादी महिला भगिनी दरबारात आली, तर प्राधान्याने तिची विचारपूस होते, तिचे प्रश्न सोडवले जातात. आपल्याकडे आलेल्या शेवटच्या व्यक्तीचे काम समजून घेतल्याशिवाय ते पुढच्या कार्यक्रमाला जात नाहीत.
त्यांच्या या कामाची पोहोच पावती म्हणजे सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने दुसऱ्यांदा त्यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालून त्यांच्या विकासकामांवर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर पवार कुटुंबाने मंत्रिपदाची संधी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची पक्षनिष्ठा व केलेल्या प्रामाणिकपणाच्या कामाची पोचपावती दिली. त्यांना राज्याच्या सात खात्यांचे राज्यमंत्री केले. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, समान्यप्रशासन व सोलापूरचे पालकमंत्री पद दिले. या काळात त्यांनी २ हजार २०० कोटी रुपयांचा विकासनिधी तालुक्याच्या विकासासाठी आणला. दुर्दैवाने मागील वर्षी राज्यात सत्तांतर झाले. मामांचे फक्त मंत्रिपद गेले, याचे दुःख करीत न बसता आपले सर्व पक्षात असलेले संबंध यांचा पुरेपूर वापर करीत त्यांची विकास गंगा सुरूच आहे.


मंत्रिमंडळात ते विविध खात्याचे राज्यमंत्री होते. मात्र, त्यावेळीही मंत्री पदाची ऐट मामांनी कधीच मारली नाही. मामा मंत्री असूनही मनं येईल तिथे थांबायचे. मामांची गाडी त्याच्यापुढे पोलिस पथकाची गाडी असा मोर्चा चाललेला असतानाही रस्त्यातच मामा कुठे चहाचा घोट घेत, तर कुठे पेरूची चव चाखत सर्वसामान्यांमध्ये रमत असत. तसेच, कधी बालगोपाळांमध्ये रमून क्रिकेट, आट्यापाट्या खेळत सायकलवर स्वार होत, असे आहेत मामा!
असे असेल तरी विधानसभेत गेल्यानंतर अनेक प्रश्नासाठी उपाय योजना शोधत असतात, अधिकाऱ्यांवर मामांचे नैतिक वजन आहे. त्यामुळे अडचण कशी सोडवायची कोणत्या योजनेत कोणते काम बसवायचे याचा नेमकेपणा अचूकपणा मामांमुळे अधिकार वर्गात येतो. यामुळेच इंदापूर तालुक्यात विकासगंगा वाहत आहे. तालुक्यात मामांनी रस्त्याचे जाळे विणले, अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध केली.

दिलखुलास व्यक्तिमत्त्व
मामा नव उद्योजकांच्या शुभारंभाला जातात. तेथे आवर्जून युवकांना जवळ बोलावून कोणत्या क्षेत्रात करिअर करणार? असा सवाल करतात व त्यांना मार्गदर्शनही करीत असतात. कधी कधी मामा शाळेत जाऊन लहान मुलांना शिकवतात. त्यांच्या तासाला लहान मुलांनाही मजा येते.
असे इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रेय भरणे हे एक मुलखावेगळं अजब गजब रसायन आहे. लहानांपासून थोरांपर्यंत आपला चाहता वर्ग वाढवत आहेत. अशा दिलखुलास व्यक्तिमत्वास उदंड आयुष्याच्या मनःपूर्वक अनंत शुभेच्छा!

(शब्दांकन : संतोष आटोळे, इंदापूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com