
खडकवासला कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडा
शेटफळगढे, ता.१८ : फेब्रुवारी महिना संपत आल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. शेतकऱ्यांच्या विहिरी व कूपनलिकेती पाण्याची पातळी कमी झाली आहे. शेतकऱ्यांना शेती सिंचित करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी खडकवासला कालव्यातून आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
खडकवासला प्रकल्पात यावर्षी शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. अशातच सध्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू हरभरा हे पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात आले आहेत. तसेच सध्या शेतात ऊसाचे पीक देखील उभे आहे. या पिकांना सध्या मुबलक पाण्याची आवश्यकता भासत आहे. मात्र जलसंपदा विभागाने अद्याप शेती सिंचनासाठी आवर्तन दिलेले नाही. अशातच सध्या उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पिके सिंचनाला येत आहेत. परंतु विहिरी व कूपनलिका यांचे पाणी कमी पडल्याने शेतकऱ्यांना आपली शेती सिंचित करण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय कालव्याच्या लाभक्षेत्रात अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहीरी आहेत. कालव्याला जवळपास ४० दिवस होऊन गेले तरी पाणी नसल्याने याही पाणी पुरवठ्याच्या विहिरींचे भूमिगत जलस्त्रोत आटल्याने गावच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे खडकवासला कालव्याला इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी तत्काळ आवर्तन सोडावे, अशी मागणी जोर धरत आहे.