
जांबूतच्या एकाचा अपघातात मृत्यू
शिरूर, ता. १९ : शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे उपचारादरम्यान निधन झाले. पोपट तुकाराम कदम (वय ४२, रा. कळमजाई मळा, जांबूत, ता. शिरूर) असे त्यांचे नाव आहे.
कदम हे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी दुचाकीवरून शेतात जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना नारायणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांचे वडील तुकाराम कदम यांनी खबर दिल्यानंतर प्रथम नारायणगाव पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली होती. दरम्यान, हा गुन्हा शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने गुरुवारी हा गुन्हा शिरूर पोलिसांकडे वर्ग केला. शिरूर पोलिसांनी या अपघातप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले करीत आहेत.