शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योगधंद्यातही उतरावे

शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योगधंद्यातही उतरावे

शिरूर, ता. २३ : ‘‘फक्त उसाच्या आणि कांद्याच्या शेतीवर शेतकरी समाज जिवंत राहणार नाही. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करण्याबरोबरच उद्योगधंद्यात उतरले पाहिजे,’’ असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी येथे केले. तसेचे, ‘शेतकऱ्यांचीच मुलं मंत्री, अधिकारी पदावर असूनही शेतकरी समाजाची अशी अवस्था का?’ असा सवालही त्यांनी केला.
शिरूर तालुका रासपच्या वतीने येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात जानकर बोलत होते. रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे, रासपचे प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर सलगर, युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित पाटील, जिल्हाध्यक्ष विनायक रूपनवर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनीता किरवे, युवक आघाडीचे नगर जिल्हा संघटक रूपेश ढवण आदी यावेळी उपस्थित होते.
जानकर यांच्या पुढाकारातून नवी दिल्लीत स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व होस्टेल उभारण्यात येत आहे. या कामाला हातभार म्हणून मेळाव्याचे मुख्य संयोजक व रासपचे तालुकाध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे व शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांच्या पुढाकारातून एक लाख रुपयांचा निधी जानकर यांच्याकडे यावेळी सुपूर्द करण्यात केला.
जानकर म्हणाले, ‘‘शेती करताना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा. कांदा, ऊस लावताना आपल्या पोराला जिल्हाधिकारी करायचे, अशी खूणगाठ शेतकऱ्यांनी मनाशी बांधा. शेती करतानाच छोटा का होईना पण धंदा सुरू करा. धंद्यात प्रगती झाल्यावर एखादी कंपनी टाका. छोट्या-मोठ्या उद्योगातूनच आपली प्रगती होणार आहे. कारण, यापुढे नोकऱ्यांची आणि त्यातही सरकारी नोकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट होत जाणार आहे. मी पंतप्रधान झालो तरी तुमच्या मुलांना कुठेही नोकरीला चिकटवू शकत नाही.’’
पंचायत समितीचे माजी सदस्य राम कदम, आमदाबाद सोसायटीचे अध्यक्ष अशोक माशेरे यांचीही यावेळी भाषणे झाली. रासपचे शिरूर शहराध्यक्ष सिकंदर पटेल यांनी स्वागत, रासपच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा चेतना पिंगळे यांनी प्रास्ताविक; तर प्रा. गोरक्षनाथ डुबे यांनी सूत्रसंचालन केले. महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षा सपना मलगुंडे यांनी आभार मानले. ॲड. अपेक्षा कुऱ्हाडे, अमोल देवकाते, विकास पवार, राजेंद्र थोरात, संदीप देवकाते, अमित खांडेकर, संताजी तिखोळे, वाल्मिकराव कऱ्हे, राजेंद्र पुणेकर यांनी या मेळाव्याचे संयोजन केले.


मी तीनच वर्षे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री होतो. परंतु, शेतकऱ्यांच्या, पशुपालकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. दुधाला लिटरमागे पाच रुपयांनी दर वाढविण्याचा मी निर्धार केला, तेव्हा अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी विरोध केला. गाय राखायला येणारा खर्च, जनावरांच्या खाद्याचे दर, त्यांच्या पालनपोषणासाठी घ्यावी लागणारी मेहनत त्यांच्यासमोर मांडूनही उपयोग झाला नाही. दुधाचा दर पैशांत वाढवा, रूपयांत नको, असे त्यांच्यासह अनेकांचे सांगणे होते. शरद पवार मंत्री असताना दुधाला तीन पैशांनी दरवाढ झाली, अनंतराव थोपटे यांच्या काळात पाच पैशांनी वाढ झाली. १२ उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपैकी दहाजण शेतकऱ्यांची मुले असूनही त्यांनी साथ दिली नाही. शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर हा विषय मांडून मंत्रीमंडळाच्या बैठकीत दुधाला पाच रुपयांची दरवाढ मिळवून दिली. माझ्या या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील खूष झाले.
- महादेव जानकर, अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com