
कृषी वीजपुरवठा खंडित न करण्याचा आदेश
तळेगाव ढमढेरे, ता.११ : कृषिपंप ग्राहकांचा वीजपुरवठा चालू बिल किंवा थकबाकी वसुली करिता तसेच इतर कोणत्याही कारणास्तव पुढील आदेशापर्यंत खंडित केला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे आणि तत्काळ प्रभावाने करण्यात यावी अशा प्रकारचा आदेश देयके व महसूल विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी एका पत्राद्वारे काढला आहे. या आदेशाच्या प्रती मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता महावितरण यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, चालू बिल भरण्यासाठी महावितरणतर्फे शेतकऱ्यांकडे तगादा लावला होता. चालू बिल न भरल्यास कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत होता. त्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. यातूनही अनेकांनी चालू बिल भरली आहेत.
कृषीपंप ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करू नये असा आदेश काढल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असल्याचे तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शेतकरी बाळासाहेब लक्ष्मण ढमढेरे, प्रदीप जेधे व इतर शेतकऱ्यांनी सांगितले.