
चासकमानचे पाणी त्वरित सोडण्याची मागणी
तळेगाव ढमढेरे, ता. २९ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे वेळ नदीतून चासकमानचे पाणी सोडण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चार दिवसांपूर्वी शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे येथील भैरवनाथनगरच्या बंधाऱ्यात पाणी सोडले होते. परंतु, अचानक वरून चासकमानचे पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे तळेगाव ढमढेरे परिसर पाण्यावाचून वंचित राहिला. भैरवनाथनगर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात अर्धवटच पाणी सोडण्यात आले. बंधारा अर्धवट भरला आणि अचानक पाणी बंद करण्यात आले. तेथून पुढचे शेतकरी व ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहिले आहेत.
सध्या तळेगाव ढमढेरे परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक व जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. परिसरात कडक उन्हाळा जाणवत असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच चासकमानच्या पाण्यावर अवलंबून असलेले ग्रामस्थ व शेतकरी मात्र पुन्हा वेळ नदीत चासकमानचे पाणी सोडण्याच्या आशेवर आहेत. परिसरातील विहिरी व इंधन विहिरी यांच्या पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. चासकमानचे पाणी त्वरित वेळ नदीत सोडून परिसरातील कोरडे पडलेले बंधारे भरून नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी आग्रही मागणी तळेगाव ढमढेरे ग्रामस्थांनी केली आहे.