
वाल्ह्यात बैलांच्या पाठीवर संदेश
वाल्हे, ता. २५ : वाल्हे (ता. पुरंदर) परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या सर्जा-राजाचा भाद्रपदी बैलपोळा सण मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरा केला. गायकवाडवाडी येथील सुहास चंद्रकांत पवार या तरुण शेतकऱ्याने बैलांच्या सजावटीतून बैलाच्या पाठीवर ‘गो लम्पी गो...’ तसेच ‘बा सरकार वाचव माझ्या धन्याला’ असे लिहून अतिवृष्टीतील सरसकट पंचनामे करून मदत करण्याबाबत सरकारला आवाहन केले. याप्रसंगी विनायक पवार, अतुल गायकवाड उपस्थित होते.
कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर या वर्षी लम्पीच्या पार्श्वभूमीवर सलग तिसऱ्या वर्षी शेतकऱ्यांनी सर्जा-राजाची वाजत-गाजत मिरवणुक न काढता घरीच पूजा करून कृतज्ञता व्यक्त केल्याचे सुहास पवार यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यातील वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, दौंडज, पिंगोरी आदि परिसरामध्ये पारंपारिक पद्धतीने लाडक्या सर्जा-राजाचा
भाद्रपद बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवून बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त केली.