गुऱ्हाळे कमी होण्याचा दौंडकरांना आनंद

गुऱ्हाळे कमी होण्याचा दौंडकरांना आनंद

यवत, ता.१३ः ''''दौंड तालुक्यातील बहुतांश गुऱ्हाळे बंद'''' या मथळ्याखाली ''सकाळ''मध्ये बातमी प्रसिद्ध होताच दौंडमधील विविध गावांतील लोकांनी आनंद केला आहे. गुऱ्हाळांमुळे होणारे प्रदूषण, निकृष्ट प्रतीच्या गुळामुळे चांगल्या गुळाची बदनामी, प्रदूषणाचा इतर पिकांवर होणारा परिणाम, अस्वच्छ कामगार, गुन्हेगारी प्रवृत्तीचा बोलबाला अशा अनेक गोष्टींमुळे तालुक्यातील सामान्यजन, शेतकरी त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर ''सकाळ''च्या बातमीनंतर आनंदायी प्रतिक्रिया उमटला आहेत.

दौंड तालुक्यात पाचशेहून अधिक गुऱ्हाळे अस्तित्वात आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेली गुऱ्हाळे लोकांच्या चिंतेचा विषय बनली होती. खासगी साखर कारखाने समाधानकारक भाव देतील, वेळेत पैसे देतील याबाबत असलेल्या शंकांमुळे गुऱ्हाळांना ऊस देण्याची प्रवृत्ती वाढतच चालली होती. मात्र, टोळ्या पळून जाणे, शेतकऱ्यांच्या उसावर ठेकेदारांनी अधिकचे पैसे घेणे, परप्रांतीय गुऱ्हाळ चालक गाशा गुंडाळून पळून जाणे, ऊसतोडणी मुकादमांकडून आर्थिक फसवणूक अशा अनेक समस्या गुऱ्हाळ व्यावसायात वाढत चालल्या होत्या. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले होते. मात्र, काही वर्षे बंद असलेला भीमापाटस सारखा कारखाना सुरू होणे, उसाच्या वाढत्या भावाच्या तुलनेत गुळाचे भाव स्थिर राहणे, गुऱ्हाळ व्यावसायातील अवैध गोष्टींविरूद्ध लोकांमध्ये जागृती होणे या सर्व बाबींमुळे गुऱ्हाळ व्यवसायाचे अर्थशास्त्र बिघडल्याने अनेक गुऱ्हाळे बाद झाली आहेत.


नागरिकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया :
मागील वर्षी अनेक परप्रांतीय गुऱ्हाळ चालकांनी ऊस पुरवणाऱ्या स्थानिक लोकांना १०- १० लाख रुपयांना फसवून पळ काढला आहे. त्यामुळे अनेक स्थानिक या व्यवसायापासून बाजूला झाले. आता लोकच गुऱ्हाळांना ऊस देणे टाळत आहेत.
- शुभम शेळके, केडगाव

छान पद्धतीने विषय मांडला, वस्तुस्थिती लोकांना कळाली, ''सकाळ''चे विशेष आभार.
-रितेश पोपळघट, धायगुडेवाडी

आमच्या भागतील गुऱ्हाळे मोठ्या प्रमाणावर इंधनासाठी प्लास्टिक वस्तूंचा वापर करतात. त्यामुळे त्याच्या प्रदूषणाचा प्रभाव माणसांसोबत जनावरे व पिकांवर आढळून येत आहे. आम्ही त्रस्त आहोत.
- अशोक नांदखिले, गार

गुऱ्हाळांमुळे तालुका कचराडेपो बनला
आपल्या परिसरातील बहुतांश गुऱ्हाळांमध्ये कचरा, प्लास्टिक, जुन्या चपला यांचा जळण म्हणून वापर करतात. गुऱ्हाळांच्या मोठ्या संख्येमुळे संपूर्ण तालुकाच जणू कचरा डेपो झालाय की काय असे वाटत होते. याचा विपरीत परिणाम फळबागा, फुलशेती, जनावरे यांच्यावर होत आहे. संबंधित यंत्रणा याकडे काणाडोळा करत आहेत. भविष्यात ''दौंड तालुका कॅन्सर रुग्णांचा तालुका'' अशी ओळख झाली तर नवल वाटू नये, अशी प्रतिक्रिया यशवंत वाघोले, (देलवडी) व सोपान नेवसे (बोरीपार्धी) यांनी व्यक्त केली आहे.

00746

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com