
‘स्वयंघोषितां’च्या दबावाला बळी पडू नका
पुणे, ता. ११ : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांचे वेळापत्रक, निवड, नियुक्त्यांबाबत स्वयंघोषित विद्यार्थी प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी अनावश्यक दबाव वाढवत असल्याचे समोर येत आहे. आयोगाने पेपर कधी घ्यावा, कसा घ्यावा, परीक्षेत एकूण किती प्रश्न विचारावे, ते कोणत्या घटकातून असावेत, एकूणच परीक्षेचा पॅटर्न कसा असावा, किती जागा असाव्यात, परीक्षा कोणत्या वेळी पुढे गेली पाहिजे यावर सातत्याने वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून काही प्रतिनिधी घटनात्मक आयोगाचे कामकाज प्रभावीत करत आहे. आयोगाच्या कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप ही विकृती असून, ती बदलण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून असे हे काही प्रतिनिधी विविध मंत्र्यांना भेटून, न्यायालयाचे दरवाजे ठोठावून आयोगाच्या नियमांच्या कक्षेत न बसणाऱ्या मागण्या करत आहेत. याचेच उदाहरण म्हणजे ऑक्टोबरमधील संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालासाठी आयोगाने इतिहासात प्रथम तिसरी उत्तरतालिका प्रसिद्ध केली. आत्ता चौथी उत्तरतालिका प्रसिद्ध करावी, यासाठी आयोगाकडे मागणी जोर धरू लागली आहे. परीक्षार्थींचा प्रत्येक परीक्षेला अनुसरून आयोगाकडे अनावश्यक मागण्या करण्याचा पायंडा पडला आहे. त्यात आपल्या प्रसिद्धीसाठी काही स्वयंघोषित विद्यार्थी संघटना या परीक्षार्थींना पाठिंबा देत असतात. काही दिवसांपूर्वीच १ ः २५ प्रमाणे मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थी पात्र करा, राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेतील सी-सॅट (c-sat) पेपर रद्द करावा, अशा मागणी आयोगाकडे केल्या आहेत. यातून आयोगाच्या स्वायत्ततेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच दोषयुक्त निवड प्रक्रिया आणि आणखी टोकाची अनिश्चितता राज्याच्या नोकरभरतीमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आरोग्य भरती गैरव्यवहार, टीईटी गैरव्यवहार असे प्रकार जर परीक्षेत आपणाला ऐकायचे नसतील, तर आपण आयोगाच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवायला हवा. आयोग अत्यंत पारदर्शकपणे कारभार करत आहे. आयोगाने विद्यार्थी संघटनांच्या दबावाला बळी पडून नये.
- पंकज गवळी, स्पर्धा परीक्षार्थी
पेपर कसा काढावा, परीक्षा कधी घ्यावी, अशा मागण्या करून आयोगावर दबाव आणण्याचा काही संघटनांचा प्रयत्न चुकीचा आहे.
- सनी चव्हाण, स्पर्धा परीक्षार्थी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कशा पद्धतीने परीक्षा घ्यावी, हा पूर्ण अधिकार त्यांचा आहे. सध्या विद्यार्थी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून केलेल्या मागण्यांकडे लोकसेवा आयोगाने लक्ष देऊ नये. काही विकृती पसरत आहे, ती बदलणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून सातत्याने होणारा हस्तक्षेप बंद व्हावा.
- महेश झगडे, माजी सनदी अधिकारी
विद्यार्थी किंवा विद्यार्थी प्रतिनिधींच्या योग्य मागण्या व सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोग अमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे; पण ज्या मागण्या अवास्तव किंवा आयोगाच्या अधिकारावरच प्रश्न उपस्थिती करतात, त्या मान्य करणे शक्य नाही.
- सुनील अवताडे, सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
-----
आयोगाच्या स्वायत्ततेवर अनावश्यक हस्तक्षेपाबद्दल आपले मत काय? व्हॉट्सअप करा पुढील क्रमांकावर ८४८४९७३६०२
-----
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..