मास्क
मास्कsakal

शाळेत मास्क हवाच

तब्बल ६२ टक्के पालकांचे मत

पुणे - एकीकडे राज्यात शाळा पूर्ण क्षमतेने सुरू आहेत, तर दुसरीकडे सीबीएसई, आयसीएसईच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष देखील सुरू झाले आहे. असे असताना आणखी काही काळ शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मास्क घालणे अनिवार्य असायला हवे,’’ असे मत तब्बल ६२ टक्के पालकांनी व्यक्त केल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

राज्यात एक एप्रिलपासून मास्क घालणे ऐच्छिक केले आहे. राज्यातील अनेक शाळा सध्या पूर्ण विद्यार्थी क्षमतेने सुरू आहेत. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी काळजी घेणे आवश्यक आहे. या परिस्थितीत पालक-विद्यार्थ्यांना नेमके काय वाटते, यासंबंधी ‘लोकल सर्कल’ या ऑनलाइन व्यासपीठामार्फत पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण घेण्यात आले. या सर्वेक्षणात देशातील ३८१ जिल्ह्यांतील जवळपास २५ हजारांहून अधिक पालकांनी मते नोंदविली आहेत. या सर्वेक्षणादरम्यान ‘आताची सद्यःस्थिती पाहता विद्यार्थ्यांना शाळेत मास्कबाबत कोणते नियम असावेत?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यात ‘शाळेत आणि शाळेबाहेरदेखील मास्क हा अनिवार्यच असावा’, असे परखड मत तब्बल ३६ टक्के पालकांनी मांडले आहे. तर फक्त शाळेत असताना (इनडोअर) मुलांना मास्क अनिवार्य असणे गरजेचे असल्याचे मत २६ टक्के पालकांनी व्यक्त केले आहे. तसेच, सध्या देशात कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी जगभरात विविध देशांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत आहे, त्यामुळे भारतातही सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क हे अनिवार्य असावे, असे तब्बल ६५ टक्के नागरिकांना वाटत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले.

शाळेत विद्यार्थ्यांसाठी मास्कबाबत काय नियमावली हवी?
- शाळेत व शाळेबाहेर दोन्हीकडे मास्क अनिवार्य : ३६ टक्के
- केवळ शाळेत मास्क अनिवार्य : २६ टक्के
- शाळेबाहेर मास्क अनिवार्य : ७ टक्के
- मास्क घालणे ऐच्छिक हवे : २० टक्के
- मास्क हे असूच नये : ६ टक्के
- सांगू शकत नाही : ५ टक्के

देशात सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य असावे का?
- मास्क घालणे अनिवार्य : ६५ टक्के
- मास्क घालण्याचे बंधन काढावे : ९ टक्के
- मास्क घालण्याचे बंधन नसावे, परंतु देशात/राज्यात/जिल्ह्यात संख्या वाढल्यास पुन्हा मास्क घालण्याचे बंधन करावे : १८ टक्के
- सांगता येत नाही : ८ टक्के

‘‘गेली दोन वर्ष मुलं सर्वत्र मास्क घालून फिरत आहेत. त्यामुळे आता मास्क वापरणे हे अनिवार्य असू नये, ते ऐच्छिक असावे. तसेच, मुलं आजारी असतील, तर मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांनी विशेष काळजी घ्यावी, त्यावेळी मात्र मास्क घालण्यास सांगितले जावे.’’
- दिलीपसिंग विश्‍वकर्मा, अध्यक्ष, महापॅरेंटस्‌

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com