
औषधांमुळे रक्तसंक्रमणापासून बचाव औषधांमुळे रक्त संक्रमणापासून बचाव
जागतिक थॅलसेमिया दिन
पुणे, ता. ७ : ‘‘मला वयाच्या पाचव्या महिन्यांपासून प्रत्येक महिन्याला रक्त संक्रमण करावे लागत होते. औषधांमुळे आता रक्त घ्यावे लागत नाही. त्यामुळे आत्मविश्वासाने उच्चशिक्षण घेत आहे,’’ श्रद्धा चव्हाण बोलत होती...
रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या चव्हाण यांची मुलगी श्रद्धा. वयाच्या पाचव्या वर्षी तिला थॅलसेमियाचे निदान झाले. त्या वेळी पहिल्यांदा रक्त भरले. आता वयाची वीस वर्षे ओलांडली तरीही तिला रक्त भरावे लागत होते. त्यामुळे रक्त भरण्याच्या दिवशी शाळेतून सुटी घ्यावी लागत. याबाबत श्रद्धा म्हणाली, ‘‘रक्त घेण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. पण, आता आधुनिक काळात काही उपयुक्त औषधे निर्माण झाली आहेत. त्यामुळे दर महिन्याला होणारे रक्त संक्रमण बंद झाले. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणावर लक्ष केंद्रित करता येते.’’
थॅलसेमिया म्हणजे काय?
- हा एक रक्तविकार आहे. तो जन्मतः असतो. आईच्या उदरात असताना लालपेशी गर्भाला मिळतात. मात्र, प्रसूतीनंतर रक्तातील लाल पेशी पाच-सहा महिन्यांमध्ये संपून जातात. त्या नवीन लाल पेशी निर्माण होण्याची शरीरातील प्रक्रिया या मुलांमध्ये होत नाही. अशा रुग्णांना लहानपणापासून रक्त द्यावे लागते.
- रक्तातील लाल पेशी आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन टिकवून ठेवतात. या पेशी रुग्णांमध्ये तयार होत नाहीत.
- रक्त देऊन हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविले जाते. सामान्य माणसांमध्ये लाल पेशींचे आयुष्य १२० दिवसांपर्यंत असते. मात्र, या रुग्णांमध्ये ते २० दिवसांपर्यंत असते. त्यामुळे वारंवार रक्त द्यावे लागते.
कसा होतो आजार
- हा आनुवंशिक आजार आहे. थॅलसेमियाचा वाहक असलेल्या आई-वडिलांकडून मुलांना तो होतो.
उपचार
नियंत्रणाचे उपाय
१. पारंपरिक उपचार :
रुग्णाला दर महिन्याला रक्त देणे हा या आजारावरील पारंपरिक उपचार आहे. त्यातून शरीरात लोहाचे प्रमाण वाढते. ते कमी करण्यासाठी वेगवेगळी औषधे घ्यावी लागतात. मात्र, कालांतराने हे वाढलेल्या लोहाचे दुष्परिणाम शरीरावर दिसतात.
२. औषधोपचार
आधुनिक काळात प्रभावी औषधे उपलब्ध झाल्याने काही रुग्णांमध्ये रक्तसंक्रमण पूर्णतः बंद करण्यात यश मिळाले आहे. तर, काही रुग्णांमध्ये संक्रमणाचा कालावधी कमी झाला आहे.
आजार बरे करण्याचे मार्ग
१ जीन आणि सेल थेरपी
२ स्टेम सेल ट्रान्सप्लँटेशन
हे दोन्ही उपाय सामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेरील असतात
संशोधन काय सांगते?
थॅलिडोमाइड उपचाराने रक्तातील फेरीटिनची पातळी कमी करण्यात यश आले. त्यासाठी हिमॅटोलॉजिस्ट डॉ. विजय रमणन यांनी थॅलसेमियाच्या औषधांसाठी संशोधन केले. वेगवेगळ्या १०४ रुग्णांवर उपचार करण्यात आले. साधारणतः १ ते ३६ वर्षे वयोगटातील ३४ स्त्रिया आणि ७० पुरुष होते. या औषधोपचारातून एक महिन्यापासून ते ४२ महिन्यांपर्यंत रुग्णांना रक्तसंक्रमण करावे लागले नाही.
थॅलसेमिया मायनर वाहक असलेली स्त्री आणि पुरुषांचा विवाह झाल्यास त्यांच्या होणाऱ्या बाळाला थॅलसेमिया मेजर होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे विवाहापूर्वी पत्रिका बघा किंवा बघू नका पण, दोघांची रक्त चाचणी मात्र नक्की करा.
- डॉ. विजय रमणन, होमॅटोलॉजिस्ट
Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12766 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..