
इतिहासाची मोडतोड हा ‘शिवद्रोह’ ः श्रीमंत कोकाटे
पुणे, ता. ३ : ‘‘लोकमान्य टिळकांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा एक दगडही बसविलेला नाही. याउलट शिवस्मारकाचा निधी हडप केला. तरीही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे टिळकांनी समाधी बांधल्याचे खोटे बोलत आहेत. ते इतिहासाची मोडतोड करत असून, हा ‘शिवद्रोह’ आहे,’’ अशी टीका इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केली.
कोकाटे म्हणाले, ‘‘राज यांनी त्यांच्या पक्षाच्या झेंड्यावर शिवमुद्रा वापरली आहे. त्याला आमचा आक्षेप आहे. जो जबाबदार नेता असतो, त्याने अभ्यासपूर्ण बोलायला हवे. जाती-जातीत तेढ निर्माण करणे हे लोकनेत्याचे लक्षण नाही. राज हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, टिळक यांचे समर्थन करतात. यातून त्यांची विचारधारा स्पष्ट होते. ते पुरंदरे प्रेमात अडकले आहेत, त्यांना इतर काही समजून घ्यायचे नाही. टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा एक दगडही रचला नाही. याउलट शिवस्मारकासाठी गोळा केलेला निधी स्मारकाच्या कामासाठी वापरला नाही. शिवचरित्राची मोडतोड करणाऱ्यांना पाठिंबा देणे हा त्यांचा शिवद्रोह आहे.’’
राज हे पुरंदरे यांचे समर्थन करतात. ते शिवप्रेमींच्या नाही तर, जेम्स लेनवादींच्या बाजूने उभे राहिले. राज यांनी लेनचा सहलेखक श्रीकांत बहुलकर यांची माफी मागितली होती. त्यामुळे तेदेखील या बदनामी कटात सहभागी आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांची माफी मागावी,’’ अशी मागणी कोकाटे यांनी केली. या पत्रकार परिषदेस राहुल पोकळे, लहू लांडगे, सुहास नाईक, सतीश काळे, रमेश यादव आदी उपस्थित होते.
महात्मा फुले यांनी शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध लावला आणि शिवजयंतीला सुरवात केली. त्यांनी ९०८ ओळींचा पोवाडा लिहिला. तसेच, छत्रपती शाहू महाराजांनी शिवस्मारकाची निर्मिती केली.
- श्रीमंत कोकाटे, इतिहास संशोधक
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59796 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..