
तलाव मालकासह पाच जणांवर गुन्हा
पुणे, ता. ३ ः जलतरण तलावामध्ये बुडून १६ वर्षीय मुलाच्या झालेल्या मृत्यू प्रकरणामध्ये तलाव व्यवस्थापनाचा बेजबाबदारपणाच कारणीभूत असल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी तलावाच्या चालक, मालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी दुपारी जांभूळवाडी परिसरात घडली होती.
तलावाचे मालक बाळासाहेब बबन जांभळे, चालक सुरेश बाळासाहेब जांभळे (दोघेही रा. जांभूळवाडी), सुरक्षारक्षक बन्सी नावडे, दुर्गेश जांभळे, प्रेम वासकले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर सोमेश रेड्डी राठोड (वय १६, रा. साईनगर, कात्रज) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी रेड्डी गोबरिया राठोड (वय ५५, रा. साईनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.
जांभूळवाडी परिसरात बाळासाहेब जांभळे यांचा अर्जुन जलतरण तलाव आहे. सोमवारी दुपारी सोमेश हा त्यांच्या जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता. अन्य मुलांसमवेत तलावामध्ये पोहत असतानाच दमछाक झाल्यामुळे सोमेश पाण्यात बुडाला.
जलतरण तलावातील पाण्याची खोली, जीवरक्षक व अन्य आवश्यक नियमांचे पालन जलतरण तलावाचे मालक व व्यवस्थापक व संबंधित व्यक्तींनी केले नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
- जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे
़़़़
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59825 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..