
जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा
पुणे, ता. ५ : औरंगाबाद येथील मातंग समाजातील मनोज आव्हाड या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन मातंग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी एल्गार मोर्चा काढण्यात आला. दलित समाजावरील अन्यायाकडे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे दुर्लक्ष होत असल्याची टीका करीत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांनी केले. यावेळी साठे म्हणाले, ‘‘बीड, उस्मानाबादसह महाराष्ट्रात मातंग समाजावर अन्याय अत्याचारांच्या घटना होत आहेत. याकडे धनंजय मुंडे गांभीर्याने पाहत नाहीत. पीडित कुटुंबीयांना आधारही दिला नाही. त्यामुळे त्यांना सामाजिक न्याय खात्याचे मंत्री म्हणून काम करण्याचा कोणताही अधिकार नाही.’’
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, सचिव महिपाल वाघमारे, मातंग आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूरज तुपे, दलित युवक आंदोलन संस्थापक सचिन बगाडे, अनिल हतागळे, अंकल सोनवणे, चंद्रकांत बारस्कर, योगेश जाधव, संजय मस्के, खंडू पवार, महादेव गायकवाड, हनुमंत गायकवाड आदी कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
--------
62224
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60581 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..