
हंगामी निवेदकांनी मांडली कैफीयत
पुणे, ता. ५ ः ‘प्रसार भारती''च्या ‘एक राज्य, एक प्राथमिक आकाशवाणी केंद्र’ या धोरणाचा फटका राज्यातील प्रादेशिक केंद्रांना बसत आहे. त्याचा परिणाम हजारो निवेदकांवर होत आहे. त्यामुळे पुण्यासह सर्व आकाशवाणी केंद्रांची सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी आकाशवाणीच्या हंगामी निवेदकांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे गुरुवारी केली.
प्रसार भारतीच्या नव्या आदेशानुसार प्रादेशिक केंद्रांच्या कार्यक्रमांवर मर्यादा आली आहे. तसेच मुंबई आणि दिल्लीवरून प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांना प्राधान्य मिळत आहे. त्यामुळे प्रादेशिक केंद्रातील हंगामी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून कार्यक्रमांच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. प्रसार भारतीच्या निर्णयामुळे प्रादेशिक भाषा आणि भौगोलिक ओळखही पुसट झाली आहे. त्यामुळे प्रादेशिक केंद्रांची सेवा पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आकाशवाणीच्या हंगामी निवेदकांसह विद्यागौरी ताम्हनकर, अर्चना साने आणि विराज सवाई यांनी ठाकूर यांची भेट घेतली आणि आकाशवाणीच्या शेकडो मान्यताप्राप्त कलाकारांना सरकारी आणि हक्काचं व्यासपीठच उरलं नसल्याची तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली. निवेदनाचा स्वीकार करून अनुराग ठाकूर यांनी आकाशवाणीच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकले आणि ‘संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून यावर चर्चा केली जाईल’, असे आश्वासन ठाकूर यांनी दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60607 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..