
आत्मनिर्भर भारत हा शाश्वतेचा मार्ग पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास; ‘जीतो कनेक्ट’चे आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे, ता. ६ : ‘‘देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना विदेशी वस्तू वापरण्याच्या गुलामगिरी मानसिकतेतून नागरिकांनी आता बाहेर पडले पाहिजे. दर्जेदार स्वदेशी वस्तूंचे उत्पादन हा त्यावरचा पर्याय आहे. त्यासाठी आत्मनिर्भर भारत हा शाश्वत मार्ग आहे,’’ असा विश्वास पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायजेशन’च्यावतीने (जीतो) शुक्रवारी वार्षिक परिषदेचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. ‘जीतो कनेक्ट : २०२२’ ही आंतरराष्ट्रीय परिषद रविवारपर्यंत (ता. ८) सुरु राहणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, आमदार माधुरी मिसाळ, उद्योजक प्रकाश धारिवाल, नरेंद्र बलदोटा, विनोद मांडोत, ‘जीतो अॅपेक्स’चे चेअरमन गणपतराज चौधरी, व्हाइस चेअरमन विजय भंडारी, ‘जीतो अॅपेक्स’चे अध्यक्ष सुरेश मुथा, ‘जीतो पुणे’चे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, ‘जीतो कनेक्ट’चे समन्वयक राजेश सांकला आदी या वेळी उपस्थित होते.
मोदी म्हणाले, ‘‘भूतकाळात काय झाले याचा ‘जीतो’चे सदस्य विचार करत नाहीत. तर भविष्यात काय घडवायचे आहे, यावर ते भर देतात. शिक्षण, आरोग्य, कल्याणकारी योजना यात जैन संस्थेने नेहमीच भरीव काम करून इतरांना प्रोत्साहित केले आहे. आता स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहित करून निर्यात उत्पादनांचे नवीन मार्ग शोधून त्यावर संस्थेने काम करावे. भविष्यात आत्मनिर्भरता हा मार्ग आणि संकल्प असून तो कोणत्याही सरकारचा उद्देश नाही, तर १३० कोटी नागरिकांचा हा निश्चय आहे.’’
वेगवान विकासाचा मंत्र
‘टुगेदर... टुवर्ड्स टुमॉरो’ ही ‘जीतो’ परिषदेची संकल्पना हाच वेगाने विकासाचा मंत्र असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. विकास सर्वव्यापी असावा. समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत तो पोहोचविण्यासाठी पुढील तीन दिवसांच्या या परिषदेमध्ये चर्चा व्हावी. या परिषदेमध्ये वर्तमान आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
टॅलेंट, ट्रेड, टेक्नॉलॉजी’ला बळ द्या
- बुद्धिमत्ता, (टॅलेंट), व्यापार (ट्रेड) आणि तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) यात देश आघाडीवर असून दररोज अनेक स्टार्टअप पुढे येत आहेत.
- पारदर्शी आणि ऑनलाइन कर रचना. ‘वन नेशन, वन टॅक्स’ याचे लक्ष्य पूर्ण केले जात आहे.
- सरकारी पोर्टलवर सुमारे ४० लाख उत्पादकांनी नोंदणी केली असून त्यातील दहा लाख लोक मागील पाच महिन्यांत जोडले गेले आहे. यातून नवीन व्यवस्थेवर लोकांचा विश्वास दिसून येत असल्याचे मोदी यांनी सांगितले.
मोदी यांनी दिला गृहपाठ
कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र बसा. सकाळपासून आपल्या दैनंदिन वापरात किती आणि कोणत्या परदेशी बनावटीच्या वस्तू वापरतो याची यादी करा. यापैकी कोणत्या वस्तूंना आपण स्वदेशी पर्यायी वस्तू देऊ शकतो, याची निर्मिती करण्याच्या दृष्टीने विचार करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.
पृथ्वीसाठी (अर्थ) काम करण्याचे आवाहन
-‘अर्थ’ या इंग्रजी शब्दातील प्रत्येक अक्षर घेऊन त्यासाठी काम करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.
- ‘ई’ म्हणजे पर्यावरणाची (एनव्हायर्मेंट) समृद्धी. पुढील १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवर करण्याचा प्रयत्न करा.
- ‘ए’ याचा अर्थ शेती (ॲग्रिकल्चर) अधिक फायदेशीर करा. तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करा.
- ‘आर’ म्हणजे पुनर्वापर (रियाकलिंग) करण्यावर भर द्या.
- ‘टी’ याचा संबंध तंत्रज्ञानाशी (टेक्नॉलॉजी) आहे. तंत्रज्ञान लोकांपर्यंत सहजतेने पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा.
- ‘एच’ हा आरोग्याशी (हेल्थ) संबंधित आहे. प्रत्येक जिल्ह्यात
वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न सुरू आहे. या क्षेत्रातही योगदानाबद्दल विचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60773 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..