
‘सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी भरीव तरतूद करावी’
पुणे, ता. १२ : जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार २०२५ पर्यंत पुण्यात दररोज एक हजार ६३४ एमएलडी सांडपाणी तयार होणार आहे. महापालिकेने हाती घेतलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून केवळ एक हजार पाच एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे कोणतीही प्रक्रिया न करता ६२९ एमएलडी पाणी नदीत सोडण्यात येईल, असे स्पष्ट झाले आहे.
शहरात निर्माण होणाऱ्या शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने भरीव तरतूद करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर आणि सारंग यादवाडकर यांनी केली आहे. जलसंपदा विभागाने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार पुणे महापालिका दररोज एक हजार ७३२ एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणी जलसंपदा विभागाकडून घेते. याशिवाय शहरात मोठ्या प्रमाणात बोअरवेल खोदल्या गेल्या असून त्यातून साधारणपणे ३१० एमएलडी पाण्याचा वापर पुणेकर करतात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकांप्रमाणे साधारणपणे यातील ८० टक्के सांडपाणी निर्माण होते. त्यामुळे शहरात दररोज एक हजार ६३४ एमएलडी सांडपाणी तयार होते. आज रोजी पुणे महापालिकेकडून त्यातील फक्त ४७७ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडते आहे. गेली पाच वर्षे रेंगाळलेल्या जायका प्रकल्पपूर्तीनंतर एकूण ८७३ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. याशिवाय, नवीन समाविष्ट गावांमध्ये आणखी १३२ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प २०२५ पर्यंत उभे करण्याचा मनपाचा मानस आहे. त्यामुळे २०२५ अखेर जेमतेम एक हजार ५ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नदीतील पाण्याच्या शुद्धीकरणाला महत्त्व देऊन त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्याचे काम मनपा करत नाही आणि राजकीय पक्षही याकडे काणाडोळा करीत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62168 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..