
समृद्ध वारसा जतनासाठी संस्कृत अध्ययनाची गरज ः लिली जोशी
पुणे, ता. १० ः संस्कृत भाषेद्वारे अचूक, स्पष्ट व शुद्ध बोलण्याचे धडे गिरविले जातात. संस्कृत ही नादमय, आशयघन, अल्पअक्षरी रमणीय भाषा आहे. आपल्या पूर्वजांनी याच भाषेत मोठे लिखाण करून ठेवले आहे. ते लिखाण म्हणजे आपल्या संस्कृतीचे दस्ताऐवजीकरण आहे. आपल्या स्वतःच्या उगमापासून ते आपले पूर्वज जाणून घेण्यासाठी या दस्ताऐवजीकरणाचा अभ्यास होणे गरजेचे आहे. आपला हा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी संस्कृत अध्ययनाची गरज आहे,’’ मत ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक डॉ. लिली जोशी यांनी व्यक्त केले.
पुण्यातील आनंदाश्रम या संस्थेच्या १३५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. जोशी या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त वसंत आपटे, विश्वस्त दिलीप आपटे, अपर्णा आपटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी लघू भास्करीयम आणि महा भास्करीयम या दोन संस्कृत पुस्तकांचे प्रकाशन केले.
संस्थेचे कार्यकारी विश्वस्त वसंत आपटे यांनी संस्थेविषयी माहिती दिली. आनंदाश्रम ही पुण्यात गेल्या १३४ वर्षांपासून संस्कृतच्या प्रचाराचे, संस्कृत ग्रंथांच्या पुनर्मुद्रणाचे आणि हस्तलिखितांचे जतन व संवर्धनाचे काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विश्वस्त दिलीप आपटे यांनी संस्थेत सुरू असलेल्या संस्कृत उपक्रमाविषयीची माहिती दिली.
उन्मेष जोशी यांनी संस्थेत उपलब्ध असलेल्या हस्तलिखितांविषयी सविस्तर माहिती दिली. विश्वस्त अपर्णा आपटे, संस्थेचा माजी विद्यार्थी कुणाल दीक्षित यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरवात प्राजक्ता देवधर यांच्या मंगल चरण गायनाने झाली. वैशाली दीक्षित यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मानस गोसावी यांचे बहारदार मोहनवीणा वादन झाले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62191 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..